'येत्या काही तासांत महाविकासआघाडी तुटेल'; शिवसेना नेत्याचा खळबळजनक दावा

Maharashtra Politics : महाविकासआघाडी जागा वाटपावरुन वाद सुरु आहे. हा वाद विकोपाला पोहचला आहे. अशातच त्या काही तासांत महाविकासआघाडी तुटेल असा खळबळजनक दावा रामदास कदम यांनी केला आहे.  

वनिता कांबळे | Updated: Oct 22, 2024, 05:32 PM IST
'येत्या काही तासांत महाविकासआघाडी तुटेल'; शिवसेना नेत्याचा खळबळजनक दावा title=

Maharashtra Assembly Elections 2024 : निवडणुका जाहीर झाल्या तरी महाविकाआघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. जागा वाटपावरुन महाविकाआघाडीत  मोठा वाद निर्माण झाला आहे. बैठकांवर बैठका होत असल्या तरी अद्याप एकमत होवू शकलेले नाही. हा वाद आता चांगलाच पेटला आहे. यावरुनच रामदास कदम यांनी महाविकासआघाडीवर निशाणा साधला आहे. येत्या काही तासांत महाविकासआघाडी तुटेल असा खळबळजनक दावा रामदास कदम यांनी केला आहे.  
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि काँग्रेस यांच्यातील प्रचंड मतभेदांमुळे काही तासांत महाविकास आघाडीत बिघाडी होणार, असा दावा रामदास कदम यांनी केला आहे. तर, शरद पवार हे काँग्रेस, शिवसेनेला संपवतील.. असं विधानही शिवसेना नेते रामदास कदमांनी केले आहे. 

उध्दव ठाकरे, नाना पटोले मुख्यमंत्री होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत. उध्दव ठाकरे पक्षप्रमुख असल्याचा आव आणतात. मात्र,  खरे पक्ष  प्रमुख असते तर शरद पवार यांच्या मांडीवर बसले नसते.  शरद पवार हे दोन्ही पक्षांना संपवतील असा दावा रामदास कदम यांनी केला आहे.  

महायुतीतल्या जागावाटपावर कसलीही नाराजी नाही मात्र, भाजपच्या कार्यकर्त्यांना समजावून सांगा, अशी विनंती शिवसेना नेते रामदास कदमांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना केलीय. जागावाटपाचा जो निर्णय होईल, तो सर्वांनाच मान्य असेल, असंही रामदास कदम म्हणाले. 

मविआत जागावाटपावरुन होत असलेला वाद मिटवण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घेतला. विदर्भातील तिढा असलेल्या जागांवरुन काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातला वाद चव्हाट्यावर आला होता. अशा परिस्थितीत शरद पवार यांनी स्वतः काँग्रेस नेत्यांशी चर्चाही केली. 

संदीप नाईकांनी हाती तुतारी घेतलीये...25 नगरसेवकांसह त्यांनी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षात प्रवेश केलाय...जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झालाय...नवी मुंबईतील मेळाव्यात  त्यांनी पक्ष प्रवेश केलाय... विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रायगडमध्ये राष्ट्रवादील मोठा धक्का बसलाय. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे खंदे समर्थक बाबू खानविलकर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतलाय.. बाबू खानविलकर हे लवकरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार आहेत.. बाबू खानविलकर हे महाड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत. खानविलकरांच्या सोडचिठ्ठीमुळे रायगडमध्ये महायुतीला जोरदार धक्का बसलाय...

रत्नागिरीत राष्ट्रवादीला फटका बसलाय. राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते अजित यशवंतरावांनी शिवबंधन बांधलय. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलाय. 
माजी आमदार अनिल गोटे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणारेत.  24 ऑक्टोबरला सकाळी 8 वाजता उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत अनिल गोटेंचा पक्षप्रवेश होणारेय. ते धुळे शहर मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यताय. त्यामुळे धुळे शहर विधानसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध ठाकरेंची शिवसेना अशी लढत रंगणारेय.