Weather Update : गेला गेला म्हणताना पावसानं पुन्हा मारली एन्ट्री; 'या' भागांमध्ये अचानक मुसळधार

Maharashtra Rain : महाराष्ट्रातील पर्जन्यमानाविषयी हवामान विभागानं मागील बऱ्याच काळापासून सातत्यानं काही अंदाज वर्तवले आणि राज्यातून मान्सून आता माघारी फिरेल अशीही शक्यता व्यक्त केली.  

सायली पाटील | Updated: Oct 10, 2023, 07:18 AM IST
Weather Update : गेला गेला म्हणताना पावसानं पुन्हा मारली एन्ट्री; 'या' भागांमध्ये अचानक मुसळधार
Maharashtra Rain Weather Update northern india to experiance rainfall

Maharashtra Rain Latest Weather Update : जवळपास महिनाभर दडी मारलेल्या पावसानं महाराष्ट्राला सप्टेंबर महिन्यात ओलंचिंब केलं. अनेकांनी याचं श्रेय नक्षत्राला दिलं, तर हवमान विभागाकडून मात्र अरबी समुद्रावरील कमी दाबाच्या पट्ट्यामुळं दिलासादायकत पर्जन्यमान झाल्याचं म्हटलं. मुद्दा असा, की हा पाऊस आता मात्र परतीच्या वाटेवर लागला आहे. इतकंच काय तर, मुंबईतून दक्षिण पश्चिम मान्सूननं निरोप घेतला असून, आता शहरातील हवामान कोरडं होत असल्याची बाब निरीक्षणास आली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

परिणामी सध्यातरी शहरात पावसाची शक्यता वर्तवली जात नाहीये. असं असलं तरीही फक्त कोकणातील काही भागांमध्ये मात्र पाऊस मधूनच हजेरी लावू शकतो. त्यामुळं अचानक आलेल्या या सरी उष्णता आणखी वाढवण्यास कारणीभूत ठरणार आहे. तिथं विदर्भ आणि मराठवाड्यातूनही पावसानं काढता पाय घेतला आहे. 

देशाच्या उत्तरेकडे थंडीची चाहूल असतानाच पावसाचीही हजेरी 

'स्कायमेट' (Skymet) या खासगी संस्थेच्या माहितीनुसार पश्चिमी झंझावातामुळं आता जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, लडाख आणि उत्तराखंडसब देशातील उत्तरेकडे असणाऱ्या पर्वतीय भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील दोन दिवसांसाठी या भागात पावसाची हजेरी असेल. 

हेसुद्धा वाचा : मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा, आरोग्य यंत्रणेचा कायापालट करण्यासाठी 'व्हिजन 2035'

 

मागील काही दिवसांपासून उत्तर भारतामध्ये थंडीची चाहूल लागली होती. पण, आता मात्र या भागांमध्ये पावसानंही हजेरी लावल्यामुळं मैदानी भागांमधील तापमानाच काही अंशी घट झाल्याचं पाहायला मिळू शकतं. तर, पर्वतीय भागांमध्ये पारा बराच खाली जेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गिलगिट, बाल्टिस्टान आणि जम्मू काश्मीरमध्ये काही प्रांतांवर हिमवर्षावही होऊ शकतो. 

देशाच्या दक्षिणेकडे आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग आणि लक्षद्वीपमध्ये पावसाच्या हलक्या सरी असतील. तर, केरळच्या किनारपट्टी भागात हवमान दमट राहील. देशातील इतर राज्यांमध्ये तुलनेनं हवामान कोरडच असणार आहे. 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More