कोकण विभागातून ३.१५ लाखांपेक्षा जास्त परप्रांतीय मजूर रवाना

कोकण विभागातील विविध जिल्ह्‌यांमध्ये लॉकडाऊनच्या काळात अडकलेल्या परराज्यातील मजुरांना त्यांच्या मूळगावी पाठविण्यात आले.

Updated: May 23, 2020, 07:23 AM IST
कोकण विभागातून ३.१५ लाखांपेक्षा जास्त परप्रांतीय मजूर रवाना  title=
संग्रहित छाया

नवी मुंबई : कोकण विभागातील विविध जिल्ह्‌यांमध्ये लॉकडाऊनच्या काळात अडकलेल्या परराज्यातील मजुरांपैकी आतापर्यंत एकूण ३ लाख १५ हजार६०१ मजुरांना २२० विशेष रेल्वेगाड‌्यांनी त्यांच्या मुळराज्यात पोहोचविण्यात आले आहे, अशी माहिती कोकण विभागाचे महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली आहे.

कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी  व सिंधुदुर्ग या जिल्हयांध्ये अडकलेल्या उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, कर्नाटक, राजस्थान, हरियाणा आणि पंजाब या राज्यांमधील नागरीकांना त्यांच्या राज्यात अथवा मुळ निवासस्थानापर्यंत पोहचविण्यासाठी विशेष रेल्वे गाडया सोडण्यात आल्या. आतापर्यंत सोडलेल्या गाड‌्या व नागरिकांची संख्या अशी ठाणे २० गाडया २५ हजार ९९१ प्रवासी, पालघर २० गाडया ३२ हजार ४३२ प्रवासी, रायगड १७ गाडया २५ हजार ५३  प्रवासी, रत्नागिरी ४ गाड्या ५ हजार ७२ प्रवासी, सिंधुदूर्ग २ गाड‌्या ३ हजार ९१२ प्रवासींना त्यांच्या मुळ राज्यात  मुळ निवासस्थानी  पोहचविण्यात यश आले आहे. अजूनही विविध गाड‌्या सोडण्याचे शासनाचे नियोजन आहे.

पराराज्यातील नागरिकांना  ज्या राज्यात  जायचे आहे, त्या राज्यासाठी असलेल्या विशिष्ट फॉर्ममध्ये आवश्यक ती माहिती भरुन त्यांची माहिती संकलीत करण्यात आली आणि त्या माहितीच्या आधारे प्रवाश्यांच्या संख्येनुसार विविध राज्यांसाठी विशेष रेल्वेगाड्या  सोडण्यात आल्या.  या गाडया सोडण्या आधी प्रत्येक प्रवाश्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच वैद्यकीय दृष्टया ज्यांचे आरोग्य सुदृढ आहे आणि ज्यांना कोरोनाची लक्षणे नाहीत अशा प्रवाशांनाच या रेल्वे गाडयांमध्ये प्रवेश देण्यात आला.  गाडीत प्रवेश देण्याआधी सर्व प्रवाशांना  शासनाने ठरवून दिलेले सोशल डिस्टंन्सिंगचे नियम व कोरोना विषयीच्या सूचनांचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.   

दरम्यान, कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत.  त्यापैकी सर्वात जास्त प्रभावी अशी उपाययोजना म्हणजे लॉकडाऊन.  लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या प्रादूर्भावाला नियंत्रणात आणण्यासाठी शासनाला बऱ्यापैकी यश मिळाले आहे.  परंतु या लॉकडाऊनमुळे विविध राज्यातून महाराष्ट्रात आलेले मजूर, कारागीर, विद्यार्थी, पर्यटक हे ज्या ज्या ठिकाणी होते त्याच ठिकाणी अडकले होते. या पराराज्यातील अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या मुळ राज्यात पाठविण्यासाठी आता शासनाने मुभा दिली आणि विशेष गाडीने त्यांना रवाना करण्यात आले, अशी माहिती कोकण विभागाचे महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली आहे.