एसटीचे विलिनीकरण डोक्यातून काढून टाका, असे का म्हणाले अजित पवार

Ajit Pawar On MSRTC Strike : एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी संपाचे हत्यार बाहेर काढले. मात्र, संपाचे हत्यार म्यान करा, असा संदेश राज्य सरकारने दिला आहे. 

Updated: Dec 25, 2021, 09:09 AM IST
एसटीचे विलिनीकरण डोक्यातून काढून टाका, असे का म्हणाले अजित पवार title=
संग्रहित छाया

मुंबई : Ajit Pawar On MSRTC Strike : एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी संपाचे हत्यार बाहेर काढले. मात्र, संपाचे हत्यार म्यान करा, असा संदेश राज्य सरकारने दिला आहे. राज्य सरकारमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे विलिनीकरण करण्याची मागणी कायम असून त्यासाठी काही कर्मचारी संपावर (ST Strike) ठाम आहेत. असे असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटीचं विलिनीकरण डोक्यातून काढून टाका, असा इशाराच कर्मचाऱ्यांना दिला आहे. (MSRTC merger with govt not possible, Ajit Pawar indicates)

एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवार यांच्या इशाऱ्यानंतर आता योग्य तो संदेश गेल्याची चर्चा सुरु झाली आहे. आधीच न्यायालयाने हा संप बेकायदेशीर ठरवला आहे. तर कामावर रुजू न झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांना घरीच पाठविण्यात आले आहे. एसटी महामंडळाकडून आवाहन करुनही कामावर न आलेल्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.  

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवार यांनी खडसावले आहे. ते म्हणाले, एसटीचे विलिनीकरण डोक्यातून काढून टाका. पगारवाढीमुळे भाडेवाढ होणार असल्याची माहिती त्यांनी हिवाळी अधिवेशाच्यावेळी विधानसभेत दिली. दरम्यान, उपमुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे एस टी कामगार संतप्त झाले आहेत.

राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे, या एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागणीवरुन अजित पवार यांनी स्पष्ट केले की, एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण होणार नाही. कुणाचेही सरकार असले तरी हे शक्य होणार नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. यावेळी विरोधकांनीही या प्रश्नावर अधिक चर्चा केली नाही. दरम्यान, आता जी समिती नेमली आहे, त्या समितीचा अहवाल काय येणार याची उत्सुकता आहे.