नाशिककरांवर पाणीसंकट, फक्त ४५ टक्केच पाणीसाठा शिल्लक

जलसाठा तब्बल सहा महिने पुरविण्याचं मोठं आव्हान

Updated: Jan 22, 2019, 04:57 PM IST
नाशिककरांवर पाणीसंकट, फक्त ४५ टक्केच पाणीसाठा शिल्लक title=

नाशिक : नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नाशिककरांनो पाणी जपून वापरा नाही तर तुम्हाला पाणी संकटाचा सामना करावा लागेल असा इशारा प्रशासनानं दिला आहे. कारण नाशिकच्या धरणांमध्ये फक्त 45 टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यंदाचा उन्हाळा कडक असेल, असा इशारा हवामान खात्याने याधीच दिला आहे. त्यामुळे जलसाठा तब्बल सहा महिने पुरविण्याचं मोठं आव्हान प्रशासनापुढे आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात साडेतीनशे गावांना 113 टँकर्सच्या मदतीनं पाणीपुरवठा करावा लागतो आहे.

नाशिकमध्ये १८०० किलोमीटरच्या जलवाहिन्यांद्वारे संपूर्ण शहरात पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठय़ासाठी ९० टक्के पाणी गंगापूर धरणातून तर १० टक्के पाणी दारणा नदीवरील चेहेडी बंधाऱ्यातून सोडलं जातं. पण आता धरणात ४५ टक्के पाणी शिल्लक राहिल्याने पाण्याचं संकट उभं राहण्याची शक्यता आहे. याआधी अनधिकृत नळ जोडणीधारकांविरोधात पालिकेने फौजदारी कारवाई केली होती. कारण यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात होतं.