पालघर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्या; भाजपची मागणी

पालघर प्रकरणाची.... 

Updated: Apr 20, 2020, 08:04 PM IST
पालघर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्या; भाजपची मागणी title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : पालघर येथील गडचिनचले गावात दोन साधु त्यांचा एक वाहन चालक यांची पोलिसांसमक्ष जमावाने निर्घृण हत्या केली आहे. संपूर्ण राज्यातून याचा निषेध नोंदवण्यात आला. ज्यानंतर आता सर्व स्तरांतून याप्रकरणीचता संतापही व्यक्त करण्यात आला आहे. संपूर्ण राज्याला आणि देशालाही हादरवणाऱ्या या घटनेच्या सीबीआय तपासाची मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. 

विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी पालघर हत्याप्रकरणाची चौकशी ही सीबीआयकडे सोपवण्याची मागणी सोमवारी केली. विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज यांसंदर्भात पालघरचे जिल्हाधिकारी यांना पत्र पाठविले आहे. सदर पत्रानुसार या गंभीर घटनेच्या वेळी पोलिसांनी नागरिकांना आवाहन करून शांतता राखण्याचे काम करायला हवे होते, तथापी याबाबत पोलिसांनी हेतुपूर्वक केलेली निष्क्रियता दिसून येते. 

साधूंची हत्या होत असताना पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेणे याचा अर्थ पोलीस कोणाच्या तरी दबावाखाली करत असल्याची शक्यता आहे असेही या पत्रात नमूद करण्यात आलं होतं. पालघर प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारे पत्र पालघर जिल्हाधिका-यांना देण्यासाठी विरोधी पक्ष नेते दरेकर पालघरच्या दिशेने निघाले होते. पण, कोरोनोच्या पार्श्वभूमीवर जिल्हाबंदी असल्यामुळे त्यांना पोलिसांनी पालघरमध्ये जाण्याची परवानगी नाकारली. परिणामी हे पत्र पालघरचे माजी आमदार पास्कर धानोरे आणि पालघर जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्यामार्फत पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती दरेकर यांनी दिली.

 

पालघरमध्ये नेमकं का झालं होतं? 

गेल्या काही दिवसांपासून पालघर जिल्ह्याच्या काही भागात सध्या चोर, दरोडेखोर फिरत असल्याच्या अफवांना उधाण आले आहे. चोर माणसांनाचही पळवून नेतात आणि किडणी काढून विकतात अशा अनेक अफवा परिसरात पसरल्या होत्या. या अफवांवर विश्वास ठेवून लोक रात्रीची गस्त घालत आहेत. गुरुवारी रात्री अशाच गैरसमजातून जमावाने तिघांचा जीव घेतला. यामध्ये अतिशय धक्कादायक बाब म्हणजे गावकऱ्यांनी पोलिसांवरही हल्ला केला आणि पोलिसांच्या गाडीतच तिघांना दगड, बॅट आणि बांबूने ठेचून तिघांची हत्या केली.