पालघरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी, शेतात गेलेल्या विद्यार्थिनीचा मृत्यू

Palghar Heat Wave: पालघरमध्ये उष्माघातामुळं पहिला बळी गेला आहे. 16 वर्षीय मुलीचा उष्माघाताने बळी गेला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

हर्षद पाटील | Updated: Apr 16, 2024, 07:39 PM IST
पालघरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी, शेतात गेलेल्या विद्यार्थिनीचा मृत्यू  title=
palghar 16 years old girl dies in palghar due to heat stroke

Palghar Heat Wave: राज्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. उष्णतेमुळं नागरिक हैराण झाले आहेत. हवामान विभागाने पाच दिवसांचा उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे.  पालघर जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. उष्माघातामुळं पालघरमध्ये एका 16 वर्षांच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. पालघरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

पालघरच्या विक्रमगड मधील केव वेडगे पाडा येथील अश्विनी विनोद रावते असं या मुलीचे नाव असून या सोळा वर्षांची आहे. अश्विनी इयत्ता 11वीच्या वर्गात शिकत होत. विद्यार्थिनीचा आज दुपारच्या सुमारास उष्माघाताने मृत्यू झाला असून तिचा मृतदेह शेताजवळ आढळून आल्याने हळहळ व्यक्त होत आहे. अश्विनी ही मनोर मधील एस.पी.मराठी विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावीच्या वर्गात शिकत होती. आज अश्विनी अकरावीचा पेपर देऊन घरी परतल्यानंतर घरी कोणी नसल्याने ती आई वडिलांना शोधण्यासाठी नदीवर गेली होती. तिथेच तिला भोवळ आली आणि ती शेतातच कोसळली. 

अश्विनीच शेत हे मूळ गावापासून काही अंतरावर असल्याने तिचा मृतदेह तब्बल दोन तास त्याच ठिकाणी पडून होता. त्यानंतर घरी आलेल्या आई-वडिलांनी तिची शोधाशोध सुरू केल्यानंतर ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे . या प्रकरणात सध्या विक्रमगड महसुल विभागाचे अधिकारी यांच्याकडून पंचनामा सुरू असून सध्या उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी अस आवाहन पालघर जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे .

दरम्यान, राज्यात तापमानात कमालीची वाढ झाली आहे. मुंबईतील सांताक्रुझ येथे आज 39.7 इतके कमाल तापमान होते तर, कुलाबा येथे 35.02 व पालघर जिल्ह्यात 36.00 इतके कमाल तापमान होते. कहर म्हणजे मुंबई लगतच्या कल्याण शहरात आज तापमानाने चाळिशी गाठली होती. कल्याणमध्ये आज 43.01 इतके तापमान होते. 

राज्यातील महत्त्वाच्या शहारातील तापमान

परभणीः 41.
पुणेः 39.4
अहमदनगर. 40.07
नाशिकः 40.07
कोल्हापूररः 39.7
औरंगाबाद 40.5
बारामती  39.7
जळगावः 42.4

धुळे शहरात तापमानाने उच्चांक गाठला

धुळे शहरा सह जिल्ह्यात तापमानाने उच्चांक गाठला आहे. धुळे शहरात तापमान 42 अंश नोंदवले गेले आहे. यंदाच्या हंगामातील हे सर्वाधिक तापमान आहे. धुळ्यात उन्हाचा तडाखा बसायला लागला असून, कमाल तापमान 42 अंश झाले आहे. धुळे जिल्ह्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून, तापमान हे 42° वर जाऊन पोहोचले आहे. वाढत्या तापमानामुळे जीवाची लाही लाही होत असून उन्हापासून बचाव करणारे टोपी, रुमाल घातल्याशिवाय बाहेर पडणं मुश्किल झाले आहे. साधारण सकाळी दहा वाजेपासूनच उन्हाची चटके बसू लागले असून दुपारनंतर रस्ते निर्मनुष्य होऊ लागले आहेत. गेल्या दोन आठवड्यापासून जिल्ह्यात तापमानाचा पारा चढतच असून खान्देशात उन्हाचा तडाखा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.