पत्रीपूल एका महिन्यात सुरू करू - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

 पत्रीपुलाचे काम अंतिम टप्प्यात

Updated: Nov 21, 2020, 10:47 AM IST
पत्रीपूल एका महिन्यात सुरू करू - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे title=

आतिष भोईर, कल्याण : अनंत अडचणींवर मात करीत पत्रीपुलाचे काम अंतिम टप्प्यामध्ये पोहचले आहे. मात्र येत्या महिन्याभरात या पुलाचे काम पूर्ण करून नागरिकांसाठी खुला होईल असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. पत्रीपुलाच्या गर्डर लाँचिंगसाठी आज आणि उद्या मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या गर्डर लाँचिंगच्या कामाची पाहणी करण्यासाठी खासदार डॉ. शिंदे घटनास्थळी आले आहेत.

गेल्या 2 वर्षांपासून पत्रीपुलाचे काम सुरू असून त्यामुळे नागरिकांनी प्रचंड त्रास सहन केला आहे. लोकांनी दाखवलेल्या या संयमाचे कौतुक करत अनेक अडचणींवर मात करून या पुलाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. आणखी महिन्याभरात हा पूल नागरिकांसाठी खुला होईल असा विश्वास खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान हे गर्डर लाँचिंग पाहण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील येणार असल्याचे खासदार श्रीकात शिंदे यांनी सांगितले आहे.

पत्रीपुलावर ७६ मीटर लांबीचा गर्डर बसवण्यात येणार आहे. त्यासाठी मध्यरेल्वेवर आज मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. शनिवारी व रविवारी सकाळी ९.५० पासून दुपारी सव्वादोन वाजेपर्यंत डोंबिवली ते कल्याणदरम्यानची लोकल वाहतूक रद्द करण्यात आली आहे.