ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १०० टक्के कर्जमाफी द्या- शरद पवार

 १०० टक्के कर्जमाफी देण्याची मागणी आम्ही सरकारकडे करत असल्याचे राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे

Updated: Aug 14, 2019, 06:02 PM IST
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १०० टक्के कर्जमाफी द्या- शरद पवार  title=

मुंबई : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १०० टक्के कर्जमाफी देण्याची मागणी आम्ही सरकारकडे करत असल्याचे राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. नवीन ऊस लावणीसाठी नवे कर्ज उपलब्ध करून द्यावे अशी मागणीही त्यांनी केली. नवीन ऊस लागणीसाठी व्हीएसआय बियाणे देईल असे त्यांनी यावेळी सांगितले. 

गेली ३-४ दिवस मी पूरग्रस्त भागाचा दौरा करत असून ३२१ गावे पुरानं बाधित, ९० हजार कुटुंबे, ३ लाख ५८ हजार लोक स्थलांतर केले. ही माझी आकडेवारी असल्याचे पवारांनी यावेळी सांगितले. शेतीचे तसेच अनेक गावांमधील ऊस पाण्याखाली गेल्यानं त्याचे नुकसान झाले आहे. वसंतदादा शूगर इन्स्टिट्यूटमधील तज्ञांची बैठक घेवून १० ग्रूप तयार करून पूरग्रस्त जिल्ह्यात पाठवण्याची तयारी केली आहे. पाणी ओसरल्यावर हे ग्रूप जातील. साखर कारखान्यांशी संपर्क साधून ऊसाची पाहणी करून ते पीक वाचवण्यासाठी मार्गदर्शन करतील असेही ते यावेळी म्हणाले. 

महत्त्वाचे मुद्दे 

- गाळपासाठी ऊस ३५ टक्के कमी पडेल  
- इफको या सरकारी खत निर्मिती कंपनीशी संपर्क साधून कमी दरात खत घेण्यासाठी मी प्रयत्न करत आहे.
- सोयाबिन पिकाचेही खूप नुकसान झाले आहे.  
- शेतीबरोबर जनावरांचे नुकसान झालंय त्याचेही लवकर पंचनामे करा
- गावातील दलितांची घरे कच्ची असल्यानं त्यांची घरे अधिक प्रमाणात पडली आहेत
- धोकादायक घरे पाहून त्यांनाही नवी घरे बांधून देण्याची जबाबदारी सरकारने घ्यावे.
- लातूर भुकंपावेळी १ लाख घरे आम्ही बांधली होती.
- तज्ञांचा सल्ला घेवून ही नवी घरे बांधावीत.
- पूररेषेच्या आतील घरे असतील त्यांना विश्वासात घेवून दुसरीकडं हलवावीत
- लातूरप्रमाणे घरबांधणीचा कार्यक्रम सरकारने हाती घ्यावा.
- छोट्यामोठ्या व्यापाऱ्यांचे जे नुकसान झालंय, त्याचेही पंचनामे करून भरपाई द्यावी.
- रस्ते बांधणी, आरोग्य सुविधा, स्वच्छता यात लक्ष घालण्याची गरज आहे.
- राष्ट्रवादीनं १०० डॉक्टर व औषधे पाठवली असून ते इथं काम करतायत.