तर मनसेला भीमसैनिक उत्तर देतील-रामदास आठवले

मनसे आणि काँग्रेस नेते संजय निरूपम यांची फेरीवाल्यांवरून जुंपली असताना, रामदास आठवले यांनी मनसेवर टीका केली आहे. आरपीआय नेते रामदास आठवले यांनी मनसे कार्यकर्त्यांवर निशाणा साधला आहे.

Updated: Oct 29, 2017, 10:03 PM IST

औरंगाबाद : मनसैनिकांनी फेरीवाल्यांवर हल्ले करू नयेत, जर अशी दादागिरी होत असेल, तर मी माझ्या भीम सैनिकांना चोख उत्तर देण्याचे सांगितले आहे, मनसेवाल्यांनी थेट फेरीवाल्यांना मारहाण करणे योग्य नाही, असं आरपीआय नेते रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

मनसेवर रामदास आठवलेंचं टीकास्त्र

मनसे आणि काँग्रेस नेते संजय निरूपम यांची फेरीवाल्यांवरून जुंपली असताना, रामदास आठवले यांनी मनसेवर टीका केली आहे. आरपीआय नेते रामदास आठवले यांनी मनसे कार्यकर्त्यांवर निशाणा साधला आहे.

भीमसैनिकांनी प्रतिहल्ले करावेत- रामदास आठवले

रामदास आठवले यांनी वादग्रस्त वक्तव्य देखील केले आहे, रामदास आठवले म्हणाले, 'लोकांना त्रास होत असेल, अशा ठिकाणी फेरीवाल्यांनी बसू नये, मात्र त्यासाठी पालिकेने स्वतंत्र व्यवस्था करून द्यायला हवी. मनसेचे कार्यकर्ते दमदाटी करत असतील, फेरीवाल्यांवर हल्ले करत असतील तर भीमसैनिकांनी प्रतिहल्ले करावे'.

तर पाकिस्तानवर हल्ला करा

फेरीवाल्यांवर दमदाटी करण्यापेक्षा कार्यकर्त्यांना लष्करात भरती करुन पाकिस्तानवर हल्ला करा, असा टोला आठवले यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला. औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलताना रामदास आठवले यांनी ही वादग्रस्त वक्तव्य केली आहेत.