LOVE STORY: वृद्धाश्रमात जुळलं प्रेम...75 वर्षांच्या आजोबांनी 70 वर्षांच्या आजीला थेट लग्नासाठी केला प्रपोज

प्रेमाला वयाचं बंधन नसत. प्रेम कुणाशीही कोणत्याही वयात होऊ शकतं. मात्र, प्रत्येकाचाचं प्रेम यशस्वी होत असं नाही. वृद्ध आजी आजोबांचे वृद्धाश्रमात प्रेम जडले आणि त्यांनी लग्नही केले (LOVE STORY). या लग्नात जात, धर्म नाही की कुंडली नाही. शरीर सुखाची आस नाही की कोणत्याही संपत्ती, हुंड्याची आशा नाही. 

Updated: Feb 28, 2023, 04:12 PM IST
LOVE STORY: वृद्धाश्रमात जुळलं प्रेम...75 वर्षांच्या आजोबांनी 70 वर्षांच्या आजीला थेट लग्नासाठी केला प्रपोज title=

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : ना उम्र की सीमा हो ना जन्म का हो बंधन... ही जगजीत सिंग यांची गजल खूपच लोकप्रिय आहे. मात्र, या गजल प्रमाने खरी खरी लव्ह स्टोरी महाराष्ट्रात पहायला मिळाली आहे. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात एका जोडप्याने आपल्या आयुष्याची नवी सुरुवात केली आहे.  वृद्धाश्रमात दुःख सांगत प्रेम जुळल आणि नंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 70 वर्षांची वधु आणि 75 वर्षांचा वर यांचा अनोखा विवाह सोहळा कोल्हापुरच्या एका वृद्धाश्रमात पार पडला.

वृध्दापकाळात नातेवाईकांनी वाऱ्यावर सोडले की आपला आयुष्यातील साथीदार एकमेकांना धीर देत कसेबसे जीवन जगत असतात. मात्र, साथीदारालाही दैवाने हिरावून घेतले तर वृध्दाश्रमाशिवाय पर्याय उरत नाही. शिरोळ तालुक्यातील घोसरवाड येथील जानकी वृद्धाश्रमातील अशाच दोन समदुःखी वृध्दांनी वयाच्या सत्तरीत विवाह बंधनात अडकले आहेत.

वृध्दाश्रम चालक बाबासाहेब पुजारी यांनी कायदेशीर बाबींची पूर्तता करून धुम़डाक्यात लग्न लावून दिल्याने या लग्नाची खूपच चर्चा रंगली आहे. अनुसया शिंदे ( वय 70 मुळ रा. वाघोली, जि. पुणे) असे वृध्द नववधूचे नाव आहे.  तर, वराचे नाव बाबूराव पाटील ( वय 75, रा. शिवनाकवाडी, ता. शिरोळ) असे आहे. 

दोघेही पाच वर्षांपासून येथील वृद्धाश्रमात आहेत. शरीराने स्वावलंबी असले तरी मानसिकदृष्ट्या खचलेल्या आहेत. दोघांचेही साथीदार देवा घरी गेले आहेत. त्यामुळे या समदुःखी वृध्दांनी एकमेकांच्या आयुष्यातील दुःखाचा पाढा वाचून मन मोकळे करता करता दोन्ही मने जुळली आणि लग्नाच्या बंधनातून एकत्र येण्यचा निर्णय घेतला. दोघांचीही तयारी असल्याने व कायदेशीर सल्ला घेवून यांच्या विवाहाला मान्यता देण्यात आली. 

23 फ्रेब्रुवारी रोजी वृध्दाश्रमातच मांडव घालून विवाह सोहळा पार पडला. ग्रामस्थ आणि प्रमुख लोकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पद्धतीने थाटात लग्न लावून देत वृद्धांची इच्छा पूर्ण केली. त्यामुळे या वृध्द जोडप्यांचा लग्न सोहळा खूपच चर्चेचा ठरली आहे. या लग्नात जात, धर्म नाही की कुंडली नाही. शरीर सुखाची आस नाही की कोणत्याही संपत्ती, हुंड्याची आशा नाही. 

उर्वरित आयुष्यात सुखदुःखात सहभागी होवून एकमेकांना मायेचा आधार असावा इतकीच माफक अपेक्षा या वृध्द जोडप्यांना आहे. वृध्दांनी स्वखुषीने लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. दोघांनी विचारपूर्वक निर्णय घेतल्याने व कायदेशीर बाबींची पूर्तता करून त्यांची इच्छा पूर्ण करुन सहचरणीबरोबर आनंदी जीवन जगण्यासाठी थाटात लग्न करून दिले. लग्नानंतरही वृध्दाश्रमातच राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.