मराठा आरक्षणासाठी मंत्रालयाच्या गेटला आमदारांनीच ठोकलं टाळं

मराठा आरक्षण मिळेपर्यंत पाणी पिणार नाही. जे होईल त्याची जबाबदारी सरकारची असेल, असा निर्वाणीचा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे. 6 कोटी मराठ्यांवर केसेस दाखल करणार का? असा तिखट सवालही त्यांनी सरकारला केला. 

Updated: Nov 1, 2023, 10:51 PM IST
मराठा आरक्षणासाठी मंत्रालयाच्या गेटला आमदारांनीच ठोकलं टाळं  title=

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आता निकराची लढाई सुरु झालीय, राज्यभर हिंसक आंदोलन होतायंत..त्यातच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वपक्षीय आमदारांनी मंत्रालयालाच टाळं ठोकलं. या आमदारांनी मंत्रालयाच्या पाय-यांवरच आंदोलन केलं. मंत्रालयाच्या गेटला कुलुप लावत सर्वपक्षीय आमदारांनी विशेष अधिवेशनाची मागणी केली. 

राजू नवघरे, अमोल मिटकरी, राहुल पाटील, कैलास पाटील, विक्रम काळे, चेतन तुपे, बाबासाहेब आजबे, यशवंत माने, निलेश लंके, बाळासाहेब पाटील, दिलीप बनकर, बाबाजाणी दुर्रानी, मोहन उबर्डे, शेखर निकम  राजेश पाटील  या आमदारांनी ठोकलं मंत्रालयाला टाळं ठोकले. 

या आमदारांनी मंत्रालयाला टाळं ठोकत जोरदार घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे आमदार या आंदोलनात सामील झाले होते. मराठा आरक्षणासाठी मंत्रालयाला टाळं ठोकणा-या सर्वपक्षीय आमदारांना आझाद मैदान पोलिसांनी ताब्यात घेतलं. तासाभरानंतर पोलिसांनी सर्व आमदारांची सुटका केली. 

दिवसेंदिवस मराठा आरक्षणाची धग वाढतेय

आठ दिवस जरांगे पाटील आमरण उपोषण करतायत. त्यामुळे दिवसेंदिवस मराठा आरक्षणाची धग वाढायला लागलीय. त्यामुळे विरोधकांसह सत्ताधारीही आमदारही रस्त्यावर उतरताना दिसले. मराठा आरक्षणासंबंधी लवकरात लवकर निर्णय होण्याची आवश्यकता आहे.

कुणबी प्रमाणपत्र एका मराठा तरुणानं जाळलं

गाजावाजा करत वाटप करण्यात आलेलं कुणबी प्रमाणपत्र एका मराठा तरुणानं जाळलंय. सरसकट मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी धाराशिवमध्ये सुमित माने या तरुणानं कुणबी प्रमाणपत्राची होळी केली.. धाराशिव जिल्हाधिका-यांनी सकाळीच कुणबी प्रमाणपत्राचं वाटप मराठा तरुणांना केलं होतं. मात्र मराठ्यांना कुणबी प्रवर्गातून सरसकट आरक्षण मिळावं या मागणीसाठी सुमित माने या तरुणानं कुणबी प्रमाणपत्राची होळी केली.. 

धाराशिवमधील संचारबंदी शिथील 

धाराशिव जिल्ह्यातील संचारबंदी उठवलीय. बुधवारी संध्याकाळी पाच वाजल्यानंतर धाराशिवमधील संचारबंदी शिथील होणारंय. धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी याबाबत लेखी आदेश काढले आहेत. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिका-यांनी संचार बंदीचे आदेश काढले होते. आता ही संचारबंदी उठवण्यात आलीय. मात्र धाराशिवमधील शस्त्रबंदी आणि जमावबंदी कायम असणारंय. 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्यात यावं यासाठी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे आणि हेमंत पाटील यांनी घेतली लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्यावर लवकरात लवकर विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी त्यांनी केलीय.