महाराष्ट्रातील 5 निसर्गसंपन्न गावं, सौंदर्य पाहून म्हणाल जणू स्वर्गच

Most Beautiful village In Maharashtra: महाराष्ट्र पर्यटकांसाठी जणू पंढरीच आहे. सुंदर समुद्र किनारे, निसर्ग सौंदर्याने नटलेली अनेक ठिकाणे आहेत. जाणून घेऊया पाच निसर्गसंपन्न गावांबद्दल 

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 18, 2024, 07:13 PM IST
महाराष्ट्रातील 5 निसर्गसंपन्न गावं, सौंदर्य पाहून म्हणाल जणू स्वर्गच title=
The Most Beautiful village In Maharashtra you can visit on Weekend

Most Beautiful village In Maharashtra: राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा। नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा असा आपला महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र ही साधू-संताची भूमी असली तरी निसर्गाचेही वरदान राज्याला लागले आहे. सह्याद्री ढाल बनून उभा आहेच पण समुद्राचे सौंदर्यही महाराष्ट्राला लाभले आहे. देश-विदेशातून पर्यटक येथे फिरण्यासाठी येत असतात. पण अजूनही महाराष्ट्रातील अनेक निसर्गरम्य ठिकाणं दुर्लक्षित आहेत. आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील पाच सुंदर गावे सांगणार आहोत. येथे तुम्ही विंकेडचा आनंदही घेऊ शकता. 

पाटगाव

पाटगाव हे ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वोत्तम निसर्ग सौंदर्यांसाठी प्रसिद्ध आहे. कोल्हापुरात हे गाव असून सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आहे. जंगलाची सैर आणि अस्सल मधाची चव चाखण्यासाठी या गावाला तुम्ही भेट देऊ शकता. या गावाला मधाचे गाव असंही म्हटलं जातं. राष्ट्रीय पातळीवर या गावाने ओळख मिळवली आहे. पाटगाव जवळच रांगणा किल्ला म्हणजेच प्रसिद्धगड ही ऐतिहासिक वास्तू आहे. किल्ल्यावरून आजूबाजूचे गाव, नदी आणि दरी यांचे निसर्गरम्य दृश्य दिसते. ट्रेकिंगसाठीही हे उत्तम ठिकाण आहे. पाटगाव धरणही तितकेच निसर्गरम्य आहे.

पुर्णगड 

रत्नागिरीतील पुर्णगड म्हणजे वैभवशाली इतिहासाचं उत्कृष्ट उदाहरण आहे. या किल्ल्याला ऐतिहासिक वारला लाभला आहे. ज्यामुळं जगभरातील अनेक इतिहासप्रेमी येथे भेट देतात. त्‍नागिरी् जिल्यातील मुचकुंदी नदीच्या मुखाजवळ पूर्णगडाचा छोटासा किल्ला गतवैभवाच्या खाणाखूणा जपत उभा आहे. पूर्णगडाच्या दक्षिण अंगाला मुचकुंदी नदीची खाडी असून पश्चिमेकडे सागर किनारा आहे

पुरुषवाडी

सह्याद्रीच्या डोंगररांगामधे वसलेली पुरुषवाडीला निसर्गाने भरभरुन दान दिले आहे. हे गाव काजवा उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. या जादुई नैसर्गिक घटनेचे साक्षीदार बनण्यासाठी पावसाळ्यात लाखो पर्यटक इथे भेट देतात. इगतपुरीपासून सुमारे 70 किमी अंतरावर पुरुषवाडी वसले आहे. या गावात तुम्ही कॅपिंगसाठी किंवा एक दिवसाच्या सहलीसाठी येऊ शकतात. 

देहना (Dehna)

देहना या गावाबद्दल महाराष्ट्रातील लोकांना फारच कमी माहिती असेल. खळखळणारी नदी, मनाचा ठाव घेणारी हिरवळ आणि अप्रतिम स्थानिक खाद्यपदार्थ यामुळं हे गाव तुम्हाला खूपच आवडेल. मुंबईपासून 130 किमी अंतरावर अहमदनगर येथे हे गाव आहे. पावसाळ्यात या गावाला आवश्यक भेट द्या. या गावाच्या जवळच असलेल्या कळसूबाई या महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरावरही ट्रेकिंग तुम्ही करु शकता. 

मोराची चिंचोली

गर्द झाडीने वेढलेले व निसर्गाने नटलेले हे गाव तुम्हाला प्रेमात पाडू शकेल. या गावचे वैशिष्ट्ये म्हणजे येथे भरपूर मोर आहेत. मुलांना घेऊन तुम्ही सहलीचा प्लान बनवत आहात तर या ठिकाणी तुम्ही त्यांना घेवून येऊ शकता.  हे गाव पुणे-नगर रस्त्यावर शिरूर, शिक्रापूर जवळ आहे. अष्टविनायकापैकी रांजणगाव गणपतीपासून साधारण २३ किमी. अंतरावर आहे. पावसाळा व हिवाळा या काळ येथे फिरण्यासाठी उत्तम आहे. पाटील मळा, थोरले मळा, महानुभाव वस्ती आणि खटकली वस्ती अशी काही ठिकाणे पहाण्यासारखी आहेत.