ठाणे-बेलापूर मार्गावर प्रचंड ट्रॅफिक, ६ किमी गाड्यांच्या रांगा

  मुंब्रा बायपास रोड बंद केल्याने बेलापूर मार्गावर प्रचंड ट्रॅफिक झालेय. ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर प्रचंड वाहतूक कोंडी दिसून येत आहे.  

Updated: May 10, 2018, 06:47 PM IST

ठाणे :  मुंब्रा बायपास रोड बंद केल्याने बेलापूर मार्गावर प्रचंड ट्रॅफिक झालेय. ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर प्रचंड वाहतूक कोंडी दिसून येत आहे. ठाण्यापासून घणसोली रेल्वे स्थानकापर्यंत जवळपास ५ ते ६ किमी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे अनेकांना याचा त्रास सह करावा लागत आहे. मुंब्रा बायपास बंद झाल्यानं शिळफाटा-महापे-घणसोली-ऐरोली-ठाणे या पर्यायी मार्गाचा वापर करण्यात येत आहे. मात्र, प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने मुंगीच्या गतीनं वाहनांची ठाण्याकडे कूच होत आहे. दरम्यान, या मार्गावरुन प्रवास करु नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

मुंब्रा बायपास मार्गावरून वाहतूक आणि ये जा करणारे प्रवासी आणि वाहन चालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. हा मार्ग सोमवार, ७ मेच्या मध्यरात्री १२ वाजलेपासून ठाण्यातल्या मुंब्रा बायपासची वाहतूक बंद करण्यात आली आहे. दुरुस्तीच्या कामानिमित्त मुंब्रा बायपास बंद ठेवण्यात येणार आहे. दुरुस्तीचं हे काम दोन महिने चालणार आहे. प्रत्यक्षात दुरुस्तीचं हे काम  १६ एप्रिलला सुरू होणार होतं. मात्र अधिसूचनेचं काम बाकी असल्यामुळं हे काम दरम्यानच्या काळात रेंगाळलं होतं. आता मंगळवारपासून हे दुरुस्तीचं काम सुरु होणार आहे. 

मुंब्रा बायपास रस्ता येत्या मंगळवारपासून तब्बल दोन महिन्यार्पयत बंद राहणार असल्याने याचे परिमाण दिसू लागले आहेत. तसेच दुरूस्ती कामामुळे वाहतूक  मार्गात केलेल्या बदलांमुळे वाहनचालकांमध्ये गोंधळ होऊ नये, यासाठी माहिती पत्रके आणि टोकनचे वाटप जेएनपीटीकडून वाहन चालकांना केले जात आहे. मात्र, ठाणे - बेलापूर मार्गावर आजपासून वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झालेला दिसून येत आहे.