ठाण्यात शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांची रॅली महिलांनी अडवली

ठाणे महापालिकेचं पाण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष 

Updated: Oct 15, 2019, 09:31 PM IST
ठाण्यात शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांची रॅली महिलांनी अडवली title=

ठाणे : ठाण्यात ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी आलेल्या शिवसेना उमेदवार प्रताप सरनाईक यांची रॅली महिलांनी अडवली. वर्तकनगर-चिरागनगर भागात गेल्या अनेक वर्षांपासून भीषण पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. ठाणे महापालिकेचं पाण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. 

रॅली या भागातून जात असताना या भागातील महिला वर्गाने शिवसेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी रॅली अडवून त्यांना जाब विचारला. या तुलनेने ठाणे शहरात आधीच पाणी कमी असतानाही अतिरिक्त पाणीपुरवठा बड्या मॉल आणि रुग्णालयांना होत असल्याने पाणीटंचाई निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ही समस्या दूर करण्याचं आश्वासन सरनाईक यांनी यावेळी दिलं आहे.

ओवळा-माजिवडा या मतदारसंघात शिवसेनेचं वर्चस्व हे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पक्षांच्या तुलनेत चांगलं आहे. शिवसेनेतून या मतदारसंघातून अनेक जण इच्छूक असले तरी विद्यमान आमदारांच्या विरोधात उमेदवारी मागण्याची परंपरा शिवसेनेत नाही. 

2014 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांना 68,571, भाजपच्या संजय पांडे यांना 57,665 तर राष्ट्रवादीच्या हणमंत जगदाळे यांना 20,686 मते मिळाली होती.