दिवाळीनंतरचे काही दिवस महत्त्वाचे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

'कोरोनाचे आकडे आपल्याला शुन्यावर आणायचे आहेत. '  

Updated: Nov 8, 2020, 02:48 PM IST
दिवाळीनंतरचे काही दिवस महत्त्वाचे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे title=

मुंबई : संपुर्ण देशात सध्या दिवाळीची तयारी सुरु आहे. अनलॉक प्रक्रिये दरम्यान अनेक नियम शिथिल करत उद्योग पूर्वपदावर येत आहेत. पण तरी देखील गाफील राहू नका. दिवाळीनंतरचे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. एकमेकांच्या विश्वासावर दिवाळी साजरी करू. कोरोनाची दुसरी लाट आपल्या राज्यात नको म्हणून काळजी घ्या. दिवाळीनंतरचे काही दिवस महत्त्वाचे असल्याचे त्यांनी जनतेला संबोधित करताना सांगितले. दिवाळी आणि करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला.  शिवाय सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवू नका असं आवाहन देखील त्यांनी जनतेला केलं. 

गेल्याकाही दिवसांपासून कोरोना रुग्ण वाढीचा वेग मंदावत आहे. त्यामुळेच आपण थोडे तणावमुक्त आहोत. सर्वांनी जे सहकार्य केलं ते अत्यंत महत्त्वाचं होतं. मात्र दुसरी लाट येऊ नये यासाठी सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवू नका. प्रदुषणामुळे कोरोनाचा संसर्ग वाढतोय त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ नको म्हणून काळजी घ्या. 

कोरोना रुग्णवाढीची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही मोहिम अत्यंत महत्त्वाची ठरली. 'माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमे'मुळे यश लाभले. कोरोना रुग्ण कमी झाले आहेत. त्यामुळे पुढचे ६ महिने नियम पाळा. ६० हजार जणांची टीम 'माझे कुटुंब माझी जबाबदारी'वर काम करत आहे. 

त्याचबरोबर, कोरोनाविरोधात मास्क हेच शस्त्र आहे असं देखील मुख्यमंत्री म्हणाले. घराघरात जाऊन जणतेची तपासणी होत आहे. मास्क न घातल्यास दंड वसूल करण्यात येईल. दिवाळीनंतर एक नियमावली करु. गर्दी टाळा.कोणीच अनावश्यक घराबाहेर पडू नका. ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचा सल्ला यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला.