नातवंडांच्या शिक्षणासाठी 75 वर्षांचे आजोबा चालवतायत रिक्षा

वयाच्या 75 व्या वर्षी खांद्यावर नातवंडांची जबाबदारी आली. 

Updated: Feb 18, 2021, 07:44 AM IST
नातवंडांच्या शिक्षणासाठी 75 वर्षांचे आजोबा चालवतायत रिक्षा title=

मुंबई: नातवंडांना मोठं करण्यासाठी आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वयाच्या 75 व्या वर्षातही हात राबत आहेत. मुलाच्या नाही तर नातवंडांना शिकवून त्यांच्या पंखांना बळ देणाऱ्या या आजोबांची कहाणी ऐकूण डोळ्याच्या कडा पाणवल्याशिवाय रहाणार नाहीत. 

वयाच्या 75 व्या वर्षी खांद्यावर नातवंडांची जबाबदारी आली. त्यांनी झटकून न देता ती हसत स्वीकारली आणि पुन्हा एकदा हात कष्ट उपसण्यासाठी कामाला लागले. या असं देसराज सिंग आजोबांचं नाव आहे. त्यांच वय 74 वर्ष आहे. ते रिक्षा चालवण्याचं काम करतात. 

मूळचे हिमाचल प्रदेशातले देसराज सिंग गेल्या 35 वर्षांपासून मुंबईत रिक्षा चालवत आहेत. त्यांचा एक मुलगा आजारपणात वारला, तर दुसऱ्यानं आत्महत्या केली. त्यामुळे तिघा नातवंडांसह अख्ख्या कुटुंबाची जबाबदारी आजोबांच्या खांद्यावर आली. आधी ते कुटुंबासह नालासोपाऱ्याला राहत होते. पण आता घरदार विकून त्यांनी नातवंडांना गावी पाठवून दिलं. गेल्या २० वर्षांपासून ते रिक्षातच राहतात, रिक्षातच जेवतात आणि झोपतातही.

खार दांडा परिसरातले इतर रिक्षाचालक हेच आता देसराज यांची फॅमिली बनलेत. पापाजी म्हणून त्यांना सगळे माया करतात. पापाजींचा संघर्ष लवकर थांबावा आणि त्यांना मदत मिळावी, अशी स्थानिक रिक्षाचालकांची अपेक्षा आहे... 

अत्यंत काबाडकष्ट करणारे देसराज आता थकलेत. रिक्षात राहून त्यांच्या पायाला जखमा झाल्यात आहेत. पण नातवंडांची पोट भरण्यासाठी, त्यांना शिकवण्यासाठी वयाच्या पंचाहत्तरीतही पापाजींचा संघर्ष सुरूच आहे. 

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक अडचणी येत असतात. एका छोट्याशा नैराश्येतून आपण टोकाचं पाऊल उचलतो. निराश होऊन हार पत्करतात आणि संकटाशी दोन हात करणे सोडून देतात त्याच सगळ्यांसाठी देसराज सिंग यांची ही संघर्षाची कहाणी प्रेरणादायी आहे