विधानसभा निवडणुकीसाठी बच्चू कडूंची शिवसेना-भाजपशी युती?

बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती संघटनेला ग्रामीण महाराष्ट्रात चांगला जनाधार आहे.

Updated: Jul 9, 2019, 11:29 PM IST
विधानसभा निवडणुकीसाठी बच्चू कडूंची शिवसेना-भाजपशी युती? title=

मुंबई: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात एक नवे राजकीय समीकरण आकाराला येण्याची शक्यता आहे. शेतकरी नेते बच्चू कडू यांनी मंगळवारी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेत्यांची भेट घेतल्याने या चर्चेला सुरुवात झाली आहे. मंत्रालयातील दालनात मंगळवारी ही बैठक पार पडली. यावेळी बच्चू कडू आणि शिवसेना नेत्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी युती करण्यासंदर्भात चर्चा झाली. 

बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती संघटनेला ग्रामीण महाराष्ट्रात चांगला जनाधार आहे. याचा फायदा निवडणुकीत शिवसेना-भाजपला होऊ शकतो. मंत्रालयात शिवसेना नेत्यांसोबत झालेल्या बैठकीला बच्चू कडू यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे बच्चू कडू शिवसेना-भाजपशी युती करण्याचा गांभीर्याने विचार करत असल्याचे दिसत आहे. 

यासंदर्भात 'झी २४ तास'शी बोलताना बच्चू कडू यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीतील युतीसंदर्भात मी शिवसेना नेत्यांशी चर्चा केली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या आमच्या पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीतही अशाप्रकारच्या युतीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. सध्या विधानसभेत प्रहार संघटनेचा केवळ एक आमदार आहे. यंदाच्या निवडणुकीत पाच आमदार निवडून आणण्याचे आमचे लक्ष्य आहे. जेणेकरून शेतकऱ्यांचे प्रश्न आणखी ताकदीने मांडता येतील. त्यासाठी आम्ही शिवसेना-भाजपच्या या प्रस्तावावर विचार करू, असे बच्चू कडू यांनी सांगितले. 

विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिने शिल्लक राहिल आहेत. सप्टेंबर महिन्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊन ऑक्टोबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवली होती.