'आजचा बंद म्हणजे सरकारच्या मीपणाचा कळस' देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल

बंद करणाऱ्या सरकारला देवेंद्र फडणवीस यांनी नविन नाव दिलं आहे

Updated: Oct 11, 2021, 03:05 PM IST
'आजचा बंद म्हणजे सरकारच्या मीपणाचा कळस' देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल title=

Maharashtra Bandh : उतर प्रदेशातील (Uttar Prades) लखीमपूर खीरी (Lakhimpur Khirir Violence) इथं झालेल्या हिंसाचाराविरोधात महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांनी आज राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. राष्ट्रवादी (NCP), शिवसेना (Shiv Sena) आणि काँग्रेसच्या (Congress) वतीनं महाविकासआघाडी सरकारकडून बंदची हाक देत हे सरकार राज्य आणि देशातील शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं सांगण्यात आलं.

दरम्यान, या बंदबाबत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी जोरदार टीका केली आहे. आजचा बंद हा सरकार पुरस्कृत आहे, तसंच आजचा बंद म्हणजे सरकारच्या मीपणाचा कळस आहे, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. लखीमपूर घटनेसाठी महाराष्ट्रात बंद केला जातो. पण राज्यातील शेतकऱ्यांना मदत दिली जात नाही. बांधावरच्या घोषणांचं काय झालं, अशी टीका फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांचं नाव न घेता केली आहे. 

आजचा हा बंद केवळ ढोंगीपणाचा कळस आहे, लखीमपूर घटनेसाठी महाराष्ट्रात बंद केला जातो, पण राज्यातील शेतकऱ्यांना मदत नाही. महाराष्ट्रात हे सरकार आल्यापासून 2 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सरकारने बांधावर जात केलेल्या घोषणा हवेत विरल्या, अशी टीका फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता केली.

मावळमध्ये पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार करणारं हेच सरकार होतं, राजकीय पोळी भाजण्याचं काम हे सरकार करत असल्याची टीकाही फडणवीस यांनी केली आहे. मुळात हे राज्य सरकारच बंद सरकार आहे, असं नवं नाव फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला दिलं. धमक्या देत प्रशासनाचा वापर करत बंद केला जात आहे. आज दिवस पूर्ण होण्याच्या आधी शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करतील अथवा ढोंगी सरकार पुन्हा सिद्ध होईल, अशी टीकाही फडणवीस यांनी केली आहे.

राजभवनसमोर नेते गेले पण मराठवाड्यात शेतकऱ्यांना भेटायला गेले का? पालकमंत्री तिथे गेले का? असा सवाल करत सगळं मीडियासमोर दाखवण्यासाठी होत असल्याचा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे. मुंबईत काही ठिकाणी बेस्ट बसेस फोडल्या, हे सर्व ठरवून केलं जात आहे. तोडफोडची नुकसान भरपाई ज्यांनी बंद केलं त्यांच्याकडून केली पाहिजे अशी मागणी फडणवीसा यांनी केली आहे. 

मावळ इथं जालियनावाला का आठवत नाही, राजकीय पोळी भाजण्याचं काम केलं जात आहे अशी टीका फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली आहे.