डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्र आहेत का? भाजपचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल

राज्याला मंदिरांची गरज आहे की आरोग्य मंदिरांची गरज आहे? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला होता

Updated: Sep 8, 2021, 10:47 PM IST
डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्र आहेत का? भाजपचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल title=

मुंबई : कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील मंदिरं बंद आहेत. भाजपकडून मंदिरं उघडण्याची मागणी सातत्याने होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. 'सध्या आरोग्यकेंद्रांची गरज आहे, मंदिरंही उघडणार पण टप्प्याटप्पयाने असं सांगत मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयं उघडू की मंदिरं उघडू, अशा कानपिचक्या मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. 

यावर आता भाजपने उत्तर दिलं आहे. राज्यात सुरु असलेली डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्र आहेत का? असा सवाल करत भाजपा नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

कट कमिशन आणि वाटाघाटी हा ठाकरे सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे का? कोविड सेंटर, आयसोलेशन सेंटर, आरोग्य सुविधा, सँनिटझर वाटप, सँनिटायझेशन या सगळ्या पुरवठा धारकांमध्ये जी काही कट कमिशनची प्रकरण समोर येतायत याच्यावर तुम्ही कधी भाष्य करणार आहात का?” असा सवालही आशिष शेलार यांनी विचारला आहे.

पब, रेस्टाँरंट, डिस्को, बार यांचे मालक यांच्याशी वाटाघाटी होतात आणि वाटाघाटी नंतर ते खुले होतात. एक्साईजची कमाई हवी म्हणुन दारुची दुकानं उघडी केलीत. मॉलमधल्या कामगारांच कारण सांगून मॉल उघडे केलेत, मग या मंदिरांच्या बाहेर नारळ, अगरबत्ती, धूप, फुलं विकणारे यांची उपासमार दिसत नाही? त्यांना जगण्याचा अधिकार नाही? मंदिरात किती लोक आले पाहिजेत या बद्दल कोरोनाचे नियम करुन बाहेर नारळ,अगरबत्ती, फुल विकणाऱ्यांचं पोट भरु शकत नाही का?' असा सवालही त्यांनी केला.

सध्या भक्त आणि देव यांची ताटातूट करण्याचं काम शिवसेना करतेय. हा करोना बंदीचा कार्यक्रम नाही तर हे देऊळ बंदीचं शिवसेनेचं अभियान आहे, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

ठाणे जिल्ह्यात आदिवासी पाड्यातील 741 बालकांचा 6 महिन्यात मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. कुठे आहे आरोग्य व्यवस्था, कुठे आहेत आऱोग्य केंद्र? कुठे आहेत पायाभुत सुविधा? देवालय नको ही तुमची भुमिका असेल पण देवालय बंद करुन एका अर्थाने राज्यभर शवालय तुम्ही उघडली आहेत, अशी टीकाही आशिष शेलार यांनी केली आहे.