अतिवृष्टीमुळे पालिकेने कार्यालये बंद ठेवण्याचे आवाहन

आज १२ वाजून ४७ मिनिटांनी ४.४५ मीटरची हाय टाईड

Updated: Aug 4, 2020, 10:36 AM IST
अतिवृष्टीमुळे पालिकेने कार्यालये बंद ठेवण्याचे आवाहन  title=

मुंबई : मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. रात्रभर कोसळत असलेल्या पावसामुळे मुंबईच्या सखल भागात पाणी साचले आहे. त्याचप्रमाणे कांदिवली येथे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दरड कोसळल्याने मीरा रोडहून मुंबईकडे येणारी वाहतूकही ठप्प झाली असून रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईचे जनजीवन ठप्प झाले आहे. 

पुढील २४ तासांत मुंबईत अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामुळे मुंबई महापालिकेने लोकांना घरीच थांबण्याचे आणि कार्यालये बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. 

डोंगराचा काही भाग एका समोरच कोसळला असून विजेचा खांबही कोसळला आहे. त्यामुळे संपूर्ण मातीचा ढिगारा रस्त्यावर आल्याने मीरारोडहून मुंबईला येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मात्र, मुंबईहून मीरारोडला जाणारा मार्ग सुरु आहे. त्यामुळे काही प्रमाणात वाहनचालकांना दिलासा मिळाला.

'या' वेळी असणार हायटाईड
४ ऑगस्ट १२.०८ सकाळी - ३.९२ मीटर
४ ऑगस्ट १२.४७ संध्याकाळी - ४.४५ मीटर
५ ऑगस्ट १२.४७ सकाळी ३.९८ मीटर
५ ऑगस्ट १.१९ दुपारी ४.४१ मीटर
६ ऑगस्ट १.२३ सकाळी ३.९७ मीटर
६ ऑगस्ट १.५१ दुपारी ४.३३ मीटर 

हवामान खात्याने दोन दिवसाचा रेड अलर्ट जाहीर केला आहे. मंगळवार आणि बुधवारी मुंबईत मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचं सांगितलं आहे.