...तर महाराष्ट्राचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्र करावे - अबू आझमी

' शहरांची, जिल्ह्यांची नाव बदलून विकास होणार नाही.'

Updated: Jan 3, 2021, 06:44 PM IST
...तर महाराष्ट्राचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्र करावे - अबू आझमी title=

देवेंद्र कोल्हटकर, मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्र करावे अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केली आहे. शहरांची, जिल्ह्यांची नाव बदलून फायदा नाही. त्यातून काही विकास होणार नाही. असं देखील अबू आझमी यांनी म्हटलं आहे.

'नवीन जिल्हे निर्माण करा आणि त्यांना नाव द्या. औरंगाबाद, अहमदनगरची नाव बदलून फायदा नाही. संभाजी महाराजांचे नाव द्याचे असेल तर रायगड जिल्ह्याला द्यावे. नाहीतर महाराष्ट्राचे नाव बदला आणि छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्र असे घोषित करा.'

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रमाणे नाव बदलण्याचे घटिया काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करू नये. असं ही अबू आझमी यांनी म्हटलं आहे.

औरंगाबाद शहराचं नाव बदलण्याची मागणी मनसेकडून होत आहे. औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करण्याची मागणी मनसेने केली आहे. याबाबत मनसेने आंदोलनाचा इशारा ही दिला आहे. त्यामुळे नामांतरावरुन आता वाद होण्याची शक्यता आहे.