राज्यात पुन्हा कोरोनाचा धोका! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले 'हे' निर्देश

गेल्या 20 दिवसांत राज्यात सक्रिय रुग्णांत 50 टक्के वाढ 

Updated: Dec 27, 2021, 04:54 PM IST
राज्यात पुन्हा कोरोनाचा धोका! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले 'हे' निर्देश title=

मुंबई : राज्यात ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय, त्यातच गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येतही वाढ होऊ लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात हजाराहून अधिक रुग्ण आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व पालकमंत्र्यांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी दिले हे निर्देश
कोविडचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग अधिक वाढविण्याची गरज आहे. आपल्याला अधिक दक्षता बाळगून काटेकोर पाऊलं उचलावी लागणार आहेत असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितलं. टास्क फोर्सची बैठकही येत्या एक दोन दिवसांत आयोजित करावी असेही त्यांनी निर्देश त्यांनी दिले आहेत.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत संसर्गावर चिंता
आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाढत्या संसर्गावर चिंता व्यक्त करण्यात आली. यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी आपल्या सादरीकरणात जानेवारीच्या मध्याला कोविडच्या सक्रिय रुग्णात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली असून लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज आहे असं सांगितलं. 

काही दिवसांपूर्वी आपण दिवसाला 8 लाख डोसेस देत होतो, सद्या 5 लाख डोसेस दिवसाला दिल्या जातात. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांनी पाठपुरावा करून आपापल्या जिल्ह्यांत लसीकरण वेगाने होईल असं पाहण्याचे निर्देश दिले. 

सहा दिवसात रुग्णसंख्येत तिपटीने  वाढ

डॉ व्यास यांनी अधिक माहिती देताना सांगितलं की 8 डिसेंबर रोजी 6200 सक्रिय रुग्ण होते. मात्र आज 10 हजार सक्रिय रुग्ण आहेत. एकूणच गेल्या 20 दिवसांत सक्रिय रुग्णांत 50 टक्के वाढ झाली असून मागील सहा दिवसांत रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाल्याची माहिती दिली. राज्यात पॉझिटिव्हिटी रेट 1.06 टक्के झाल्याचेही ते म्हणाले.