'देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा भ्रष्टाचार, एसआयटीमार्फत चौकशी करा'

नरेंद्र मोदी हे महापुरुषांपेक्षा मोठे आहेत असं दाखवण्याचा भाजपचा प्रयत्न - नाना पटोले

Updated: Mar 6, 2022, 08:07 PM IST
'देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा भ्रष्टाचार, एसआयटीमार्फत चौकशी करा' title=

मुंबई :  धारावी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात तत्कालीन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) सरकारने मोठा भ्रष्टाचार केला आहे. पुनर्वसन प्रकल्पासाठीच्या 45 एकर जमिनीसाठी फडणवीस सरकारने रेल्वेला 800 कोटी दिले. पण आजपर्यंत ती जमीन राज्य सरकाला मिळालेली नाही आणि 800 कोटी रुपयेही परत मिळाले नाहीत. ही जनतेच्या पैशाची लूट असून या घोटाळ्याची एसआयटी (SIT) मार्फत चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.

धारावीतील लोकांना चांगली घरे मिळावीत, धारावीचा कायापालट व्हावा, मुंबई स्वच्छ व सुंदर व्हावी यासाठी विलासराव देशमुख यांचे सरकार असताना धारावीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी पुनर्वसन प्रकल्पाची योजना मांडली होती. परंतु काहीकारणाने ती कार्यान्वित होऊ शकली नाही. 

ही योजना देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने सुरु केली. याकामी फडणवीस सरकारने 800 कोटी रुपये रेल्वेला जमिनीसाठी दिले पण आजपर्यंत त्या योजनेचे काम पुढे गेले नाही. जमीनही मिळाली नाही आणि पैसेही परत आलेले नाहीत. ह्या पैशाचे काय झाले? योजना का फसली? जनतेचे पैसे रेल्वेला दान करण्याचा अधिकार फडणीवीस यांना कोणी दिला ? याची चौकशी एसआयटीचे गठन करून त्यामार्फत करावी, हवं तर ईडी व सीबीआय चौकशीसाठी शिफारस करावी अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली असून हा प्रश्न अधिवेशनातही उपस्थित करणार असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

रश्मी शुक्लांवर ५०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा 
पुणे पोलीस आयुक्त पदावर कार्यरत असताना रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीरपणे माझे फोन टॅपिंग केले. अंमली पदार्थांच्या व्यापाराशी माझा संबंध लावून अमजद खान असं मुस्लीम नाव ठेवून फोन टॅप करण्यात आले, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यावेळी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस होते, त्यांचा सहभाग यामध्ये असेल तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल,असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

सध्या मुख्य आरोपी रश्मी शुक्ला आहेत असं समोर आलं आहे. माझा फोन टॅपिंग झाल्याचा आरोप मी केला होता. विधानसभेतही हा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रकरणी रश्मी शुक्ला आणि संबंधित व्यक्तींवर ५०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकणार असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. 
   
भाजपकडून छत्रपतींचा अवमान
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले हे आमचं दैवत आहेत. आमच्या या दैवतांचा भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सातत्याने अवमान करत असतात. कर्नाटकातील भाजपा सरकारही छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करत आहे. भाजपाची ही विकृत्ती महाराष्ट्राच्या जनतेला आवडणारी नाही अशी टीका नाना पटोले यांनी केली.

आजही पुण्यातील दौऱ्यात  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणाऱ्या पगडीवर छत्रपत्री शिवाजी महाराजांची राजमुद्रा लावण्यात आली होती. काँग्रेसने त्याला आक्षेप घेतल्यावर ती राजमुद्रा काढण्यात आली. नरेंद्र मोदी हे आमच्या महापुरुषांपेक्षा मोठे आहेत हे भाजपा दाखवण्याचा प्रयत्न करत असते परंतु मोदी हे शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्यासारख्या महापुरुषांपेक्षा मोठे नाहीत हे महाराष्ट्राच्या जनतेने ठणकावून सांगितलं आहे तरीही जाणीवपूर्वक भाजपाकडून त्याची पुनरावृत्ती केली जात असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.