कोरोनाच्या संकटकाळात राजकारण करू नका, गडकरींचा महाराष्ट्रातील नेत्यांना सल्ला

ही वेळ आपला राजकीय डमरु वाजवण्याची नव्हे.

Updated: Apr 22, 2020, 08:24 PM IST
कोरोनाच्या संकटकाळात राजकारण करू नका, गडकरींचा महाराष्ट्रातील नेत्यांना सल्ला title=

मुंबई: कोरोनाच्या संकटकाळात महाराष्ट्रातील नेत्यांनी राजकारण करू नये. राजकारणापेक्षा राष्ट्रकारणाला प्राधान्य द्यावे, असा सल्ला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना  दिला आहे. ते बुधवारी 'झी २४ तास'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते. 

यावेळी त्यांनी महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरु असलेल्या कुरघोडीच्या राजकारणाविषयी नापसंती व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, कोरोनाच्या संकटामुळे देशातील गरीब जनता अडचणीत सापडली आहे. कोरोनाच्या संकटाच्या काळात कुणीही राजकारणाचा डमरू वाजवू नये. मलादेखील अनेकदा महाराष्ट्र सरकारच्या काही बाबी पटत नाहीत. तेव्हा मी थेट मुख्यमंत्री किंवा सचिवांशी चर्चा करतो. चुका सगळ्यांकडून होतात, अशावेळी चर्चा करुन मार्ग काढायचा असतो. एकमेकांवर जाहीर टीका करून वाद निर्माण करणे टाळायला पाहिजे. अमेरिकेत ९\११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर राजकीय पक्ष आपापसातील वाद बाजूला ठेवून एकत्र आले होते. त्यामुळे आपणही कोरोनासारख्या संकटाच्या काळात राजकारण बाजूला ठेवले पाहिजे. आपला राजकीय डमरू वाजवण्याची ही वेळ नाही. एकदा हे संकट सरल्यानंतर आपण पुन्हा राजकारण करायला मोकळे आहोत, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. 

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सत्ताधारी आणि भाजप नेत्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून सातत्याने खटके उडताना दिसत आहेत. भाजपच्या आमदारांनी आपला पगार मुख्यमंत्री सहायता निधीला न देता पक्षाच्या कोषात जमा केला होता. यानंतर वाधवान प्रकरण, वांद्रे परिसरात जमलेला जमाव, गरिबांना सरकारकडून पुरेशी मदत मिळत नसल्याचे मुद्दे उपस्थित करून भाजपने राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता.