...म्हणून SSR आत्महत्याप्रकरणी आदित्य ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण

सुशांत सिंह राजपूत, रिया चक्रवर्ती इथपासून... 

Updated: Aug 6, 2020, 05:07 PM IST
...म्हणून SSR आत्महत्याप्रकरणी आदित्य ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण title=

मुंबई : अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची बिहार पोलीसांची शिफारस स्वीकारण्याची तयारी केंद्राकडून दाखवण्यात आली आहे. गेल्या आठवड्याभरामध्ये घडलेल्या अनेक घडामोडींमुळं सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं आहे. याच प्रकरणात बुधवारी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुलगा आणि राज्याचं पर्यावरण, पर्यटन मंत्रीपद भुषवणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी आपल्या बाजूनं एक स्पष्टीकरण दिलं. 

आदित्य ठाकरे यांनी नेमकं हे स्पष्टीकरण कशासाठी दिलं, याचा उलगडा शिवसेना नेते संजय राऊत यांनी झी न्यूजशी संवाद साधताना केला. सुशांत सिंह राजपूत, रिया चक्रवर्ती इथपासून ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्याचा कोणाचा प्रयत्न सुरु आहे, इथपर्यंतच्या प्रश्नांना उत्तरं दिली. 

'सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र शासनाची भूमिका विचारात घेण्याच ठरवलं असून, भूमिका मांडण्यास सांगितलं आहे. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये आपली बाजू मांडण्यात येईल. सीबीआयच्या निमित्तानं हे सारं दबावाचं राजकारण आहे. त्यामुळं ज्याला जे करायचं आहे त्यानं ते करावं. मुंबई पोलिसांची जगभरात ख्याती आहे. ते तपास करत आहेत यात कोणतंही दुमत नाही', असं राऊत म्हणाले. 

विरोधी पक्षाकडून ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. सत्ते न येण्याच्या कारणास्तव ही राजकीय खेळी खेळली जात असली तरीही त्यांना याची किंमत मात्र मोजावी लागेल असा इशाराही राऊतांनी दिला. 

दरम्यान, आदित्य ठाकरे यांचंही या प्रकरणात नाव पुढे येऊ लागल्यानंतर अखेर त्यांनी मौन सोडलं होतं. हे घाणेरडं राजकारण सुरु असल्याचं म्हणत आपण या प्रकरणी बऱ्याच अंशी संयम राखलं आहे, असं म्हणत आपला या संपूर्ण प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याची बाब त्यांनी स्पष्ट केली होती. ज्यानंतर राजकीय वर्तुळात काही हालचालींना वेग आल्याचं दिसून आलं.