शंभर धमक्या आल्या तरी मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचणार, राणा दाम्पत्याचा निर्धार

उद्या सकाळी 9 वाजता मातोश्रीवर हनुमान चालीसा पठन करणार

Updated: Apr 22, 2022, 03:48 PM IST
शंभर धमक्या आल्या तरी मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचणार, राणा दाम्पत्याचा निर्धार title=

मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.  आमची भूमिका स्पष्ट आहे, ज्या पद्धतीने हनुमान जयंतीच्या शुभपर्वावर मी विनंती केली होती, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना की हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आमच्या हृदयात आहेत आणि मातोश्रीची वारी करण्याची वेळ आम्हाला येऊ देऊ नका.

महाराष्ट्रावर ज्या पद्धतीने संकटं सुरु आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भात येत नाहीत. विदर्भाच्या शेतकऱ्याच्या बांधावर जात नाहीत. शेतकऱ्याला कुठल्या प्रकारची मदत करत नाहीत. मंत्रालयात दोन-दोन वर्ष जात नाहीत. कुठेतरी ज्या पद्धतीने विकास थांबलेला आहे. शेतकऱ्याची परिस्थिती बिकट आहे, विकास थांबलेला आहे, औद्योगिस विकास थांबलेला आहे, बेरोजगारी वाढत आहे. या उद्देशाने या संकटातून मुक्त होण्यासाठी हनुमान चालिसाचं वाचन केलं पाहिजे, अशा प्रकारची विनंती केली.

'उद्धव ठाकरे हिंदुत्व विसरले'
ज्या ठिकाणी  बाळासाहेबांची श्रद्धा आणि मातोश्री आपण हृदयामध्ये ठेवतो हिंदुंच्या नावाने त्या ठिकाणी हनुमान चालिसाला विरोध होत असेल तर मला असं वाटतं, की उद्धव ठाकरे हिंदुत्व विसरले आहेत. आणि हिंदुत्वाची दिशा सोडून ते दुसऱ्याच दिशेला जाऊन या महाराष्ट्राचं वाटोळं करत आहे. अशी टीका रवी राणा यांनी केली आहे.

महाराष्ट्रावरची साडेसाती संपवण्यासाठी हनुमान चालिसा
म्हणून महाराष्ट्रावर जे विघ्न आलेलं आहे, जी साडेसाती महाराष्ट्रात सुरु झालेली आहे, त्यामुळे हे विघ्न संपवण्यासाठी हनुमान चालीसा वाचली पाहिजे, असं रवी राणा यांनी म्हटलं आहे. 

आज जे आम्ही या ठिकाणी आलो, शांततेनं आणि धार्मिक उद्देशाने आम्ही या ठिकाणी आलो आहोत. हनुमान चालीसाचं वाचन मातोश्रीवर आम्हाला करायचं आहे. या उद्देशाने आम्ही उद्या सकाळी नऊ वाजता मातोश्रीवर जाणार आहे असा ठाम निर्धार रवी राणा यांनी बोलून दाखवला.

पोलिसांनी पाठवली नोटीस
पोलीस विभागाची नोटीस आम्हाला आलेली आहे. पोलीसांनी १४९ ची नोटीस दिलेली आहे त्यानुसार त्यांनी सांगितलं की बाहेर पडू नका, कायदा सुव्यवस्था बिघडेल, पण ज्या शिवसैनिकांना जबाबदारी दिली आहे उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालिसा, नवनीत राणा आणि रवी राणा यांचा विरोध करा, ते काहीतरी गोंधळ करतील, पण आम्ही या ठिकाणी गोंधळ करायला आलेलो नाहीए, असं रवी राणा यांनी म्हटलं आहे. 

विरोधाचा सामना करण्यासाठी सज्ज
मुंबईच्या जनतेला कोणता त्रास होईल असा आमचा उद्देश नाही. आमचा एक मात्र उद्देश आहे या महाराष्ट्रावर जे संकट आलेलं आहे या संकटाच्या मुक्तीसाठी हनुमान चालीसा श्रद्धेने करण्यासाठी मातोश्रीची वारी करणार आहोत. यासाठी जर आमचा विरोध होत असले तर त्या विरोधाचा सामना करण्यासाठी आमची तयारी आहे असं आवाहनी आमदार रवी राणा यांनी दिलं आहे. 

उद्धव ठाकरेंना हिंदुत्त्वाचा विसर
ज्या हिंदुत्नाच्या भरवश्यावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, ज्या हिंदुत्वाचं नाव घेऊन ते मतं मागतात, त्या हिंदुत्वाचा विरोध करुन त्यांना सत्तेचा लोभ आलेला आहे आणि बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडलेला आहे तो विचार जागृत करण्यासाठी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसाचं पठण करणार आहोत. यावर आम्ही ठाम आहोत. 

बाळासाहेब आज असते तर एकवेळा नाही तर शंभर वेळा हनुमान चालीसा वाचायची आम्हाला परवानगी दिली असती, आणि आमचं स्वागतही केलं असतं असा टोला रवी राणा यांनी लगावला आहे.

शेतकरी आंदोलनावेळी मला नऊ वेळा जेलमध्ये ठेवलं, आज सुद्धा आदेश होते की मला अमरावतीतून बाहेर पडू दिलं जाऊ नये, मला माहित आहे, सरकार तुमचं आहे, पण जय श्रीराम आणि बजरंग बलीचं नाव घेण्यासाठी आम्हाला कोणी थांबवू शकत नाही. पोलिसांना आम्ही पूर्ण सहकार्य करण्याचं काम आम्ही करु. 

पूर्ण जीवंत मुंबईत आलो
ज्यांना हेच कळलं नाही की मुंबईला आलेलो आहे, मुंबईत पाय ठेवून दाखवा असं त्यांनी म्हटलं होतं, मी फक्त पाय ठेऊन नाही तर पूर्ण जीवंत इथे आहे. अशा शंभर धमक्या आल्या तरी आम्ही हनुमान चालिसा वाचणार असा निर्धारच रवी राणा यांनी केला.

मोदींचा फोटो वापरुन मतं
सत्तेवर असलेली शिवसेना भाजपच्या  भरवशावरच आहे. मोदींचा फोटो वापरुन त्यांनी मतं मागितली. भाजपवर खापर फोडून आम्हाला बदनाम करु नये, आम्ही स्वतंत्र आहोत. मी अपक्ष आमदार आहे, नवनीत राणा अपक्ष खासदार आहे. त्यामुळे हिंदुत्वचं नाव घेण्यासाठी आम्हाला शिवसेना किंवा उद्धव ठाकरे थांबवू शकणार नाही. 

उद्धव ठाकरे जेव्हापासून मुख्यमंत्री झाले तेव्हापासून महाराष्ट्रात हाहाकार माजला आहे. शेतकऱ्याची परिस्थिती खराब आहे. बेरोजगारी वाढली आहे. विकास थांबला आहे. त्यामुळे त्याचं विघ्न संपवण्यासाठी त्यांनी हनुमान चालिसा वाचणं गरजेचं आहे, असं रवी राणा यांनी म्हटलं आहे.