मुंबईत विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला जोर; सखल भागात पाणी, समुद्राला उधाण

Heavy rains in Mumbai : मुंबईत अनेक तासांपासून सुरु असलेल्या पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, पुन्हा संततधार सुरु झाली आहे.  सखल भागात पाणी साठण्यास सुरुवात झाली आहे.

Updated: Jul 6, 2022, 10:27 AM IST
मुंबईत विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला जोर; सखल भागात पाणी, समुद्राला उधाण title=
Image Source : PTI Photo

मुंबई : Heavy rains in Mumbai : मुंबईत अनेक तासांपासून सुरु असलेल्या पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, पुन्हा संततधार सुरु झाली आहे. दरम्यान,  मुंबई लोकल ट्रेन सुरळीत असली तरी अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. पश्चिम रेल्वे त्याच बरोबर मध्य रेल्वे सुरळीत सुरु असल्याची माहिती आहेत. कुठेही पाणी साचलेले नाही, जनजीवन सुरळीत आहे. सखल भागात पाणी साठण्यास सुरुवात झाली आहे.

रात्रभर विश्रांतीनंतर मुंबईत पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. महालक्ष्मी, वरळी, दादर, माटुंगा भागात पाऊस आहे. माहिम, बांद्रा परिसरातही मुसळधार पाऊस कोसळत आहे. तसेच मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईत काही भागांमध्ये पावसाची विश्रांती तर काही भागांत पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. 

मुंबईकरांनो सावधान, पावसामुळे समुद्राला उधाण आले आहे. त्यातच दुपारी सव्वाचार वाजता समुद्रात उंचच उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारपट्टीवर जाऊ नका. मुंबई किना-यावर आज सव्वा चार वाजता भरती येणार आहे. 

मुसळधार पावसामुळे मुंबईच्या काही भागात पाणी साचायला सुरूवात झाली. मानखुर्द रेल्वे पूल परिसरात पाणी साचलंय. त्यामुळे वाहतूक मंदावली आहे. तसंच सी लिंकच्या वरळी भागातही पाणी साचले आहे. पश्चिम उपनगरातही पावसाचा जोर मोठा आहे. पश्चिम उपनगरात खार सबवे भागात पाणी साचल्याने वाहतूक संथगतीने सुरू आहे. 

हार्बर रेल्वे मार्गावरच्या खांदेश्वर रेल्वे स्टेशनच्या सबवेमध्ये सकाळी पाणी साचलं होतं. ज्यामुळे नागिरकांना याच साचलेल्या पाण्यातून प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी वाट काढावी लागत होती. दरवर्षी पावसाळ्यात खांदेश्वर रेल्वे स्थानकात हीच परिस्थिती असते, मात्र प्रशासन याकडे लक्ष देत नाही.  

वसई विरार नालासोपारा शहरात काल रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. सखल भाग, रस्ते परिसर दीड ते दोन फूट पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झालंय...नालासोपारा पूर्वेकडचा जवळपास सर्वच परिसर पाण्याखाली गेलाय...सेंट्रल पार्क, तुळींज, अचोळे भागात पाणी साचलंय...या पाण्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवरही मोठा परिणाम झालाय...

काल जोरदार पाऊस झाल्याने हार्बरलाईनवर कमरेइतकं पाणी साचलं होते. त्यामुळे रेल्वे वाहतूक उशिराने सुरु होती. मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने हार्बरलाइनवरील गाड्या उशिराने धावत होत्या. टिळक नगर ते कुर्ला रेल्वे क्वार्टर रोड दरम्यानच्या रेल्वे रुळांवर कमरेएवढं पाणी साचले होते.