मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, बेस्टच्या ताफ्यात 2100 इलेक्ट्रिक बस येणार

मुंबईत आता दिसणार फक्त इलेक्ट्रिक बसेस, पुढच्या वर्षभरात  एकूण 2100 बसेस धावणार मूंबईच्या रस्त्यावर 

Updated: May 23, 2022, 07:44 PM IST
मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, बेस्टच्या ताफ्यात 2100 इलेक्ट्रिक बस येणार title=

मुंबई : लोकल सेवेनंतर मुंबईची दुसरी लाईफलाईन म्हणून ओळखली जाणाऱ्या बेस्ट बसने आता कात टाकली आहे. पेट्रोल-डिझेलचे वाढते दर आणि वाढत्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी बेस्टच्या ताफ्यात लवकरत 2100 इलेक्ट्रिक बसेस येणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर आणि आरामदायी होणार आहे.

बेस्ट बसेसच्या ताफ्यात येत्या वर्षभरात एकूण 2100 नव्या इलेक्ट्रीक बसेस दाखल होत आहेत. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड (OLECTRA) ने बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) कडून 2100 इलेक्ट्रिक बसेससाठी सर्वात मोठी मागणी मिळवली आहे. 

ह्या मागणीचे  मूल्य रु.3675 कोटी इतकं आहे. Evey Trans Private Limited (EVEY) ला BEST कडून लेटर ऑफ अवॉर्ड (LoA) प्राप्त झालं आहे. 

या आदेशानुसार  12 वर्षांच्या कालावधीसाठी ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट (GCC)/Opex मॉडेलवर 2100 इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा करण्यात येणार आहे. 12 महिन्यांच्या कालावधीत या बसेस वितरित केल्या जाणार आहेत. ऑलेक्ट्रा या बसेसची देखभाल देखील कराराच्या कालावधीत केली जाणार आहे.

इलेक्ट्रिक मोबिलिटी मध्ये अग्रगण्य  कंपनी असलेली ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड या करारानुसार 12 मीटर एसी बसेस पुरवणार आहे. मुंबईत बेस्टसाठी आधीच कंपनीच्या 40 इलेक्ट्रिक बसेस धावत आहेत. सध्या, EVEY आणि Olectra Greentech Limited देशातील विविध राज्य परिवहन उपक्रम (STU) मध्ये इलेक्ट्रिक बस चालवत आहेत.   

पुणे (PMPML), हैदराबाद, गोवा, डेहराडून, सुरत, आणि अहमदाबाद, सिल्वासा आणि नागपूर ह्या शहरातील वाहतूक व्यवस्थेत या बसेस अतिशय उत्तम सेवा बजावत आहेत .

ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक के.व्ही. प्रदीप यांनी याबाबत माहिती दिली. 'बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) कडून ही सर्वात मोठी ऑर्डर मिळाल्याने आम्हाला आनंद होत आहे. भारताच्या आर्थिक राजधानीत सर्वात मोठी इलेक्ट्रिक बस फ्लीट चालवणे ही अभिमानाची गोष्ट आहे. आम्ही वेळापत्रकानुसार बसेस देऊ आणि मुंबईतील नागरिकांना उत्तम प्रवासाचा अनुभव देऊ' असं त्यांनी म्हटलं आहे.