किरीट सोमय्यांनी घेतली पूल कोसळल्याची जबाबदारी

 पश्चिम द्रुतगतीमार्गावर वाहतूक कोंडी असताना आज त्यात आणखी भर पडली.

Updated: Jul 3, 2018, 03:32 PM IST

मुंबई : मुंबईत पूल कोसळल्याप्रकरणी जबाबदारी खासदार किरीट सोमय्या यांनी घेतली आहे.  यासंदर्भात संसदेच्या अधिवेशनात चर्चा घडवून आणणार असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं तर रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी त्या त्या प्राधिकरणाच्या अखत्यारीत पूलाचं स्ट्रक्चरल ऑडीट करण्यासंदर्भात पियुष गोयल यांच्याशी चर्चा केल्याचा दावा सोमय्या यांनी केला.

वाहतूक ठप्प 

मुंबईकरांसाठी मंगळवारची सकाळ चांगलीच दैना उडवून गेली. सकाळी सातच्या सुमारास अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा पूल कोसळला... आणि एकच गोंधळ उडला. रेल्वे सेवा ठप्प झाल्यानं नोकरदारांनी रस्ते मार्गाचा अवलंबला... एरव्हीही पश्चिम द्रुतगतीमार्गावर वाहतूक कोंडी असताना आज त्यात आणखी भर पडली. नोकरदारांनी कार्यालय गाठण्यासाठी रस्ते वाहतुकीचा पर्याय निवडला मात्र तिथेही त्यांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतंय.

पाच जण जखमी

या दुर्घटनेत पाच जण जखमी झालेत. जखमींना जवळच्याच कुपर रुग्णालयात हलवण्यात आलंय.  यात २ जणांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती गंभीर आहे... तर तीन जणांना फ्रॅक्चर झालंय. एकूण चार पुरुष आणि एक महिला यात जखमी झाले आहेत... द्वारकाप्रसाद शर्मा, मनोज मेहता, हरिश कोहाटे, गिंधम सिंघ अशी जखमी झालेल्या पुरुषांची नावं आहेत... तर एक महिला जखमी आहे.