'मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद द्या'

कोरोना विरोधातील लढाईत आपण एकटे नाही,तर सारे सोबत आहोत.

Updated: Apr 4, 2020, 07:06 AM IST
'मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद द्या' title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटे हातात दिवे घेऊन उभं राहण्याचं आवाहन संपूर्ण जनतेला दिलं आहे. या आवाहनानंतर मोदींवर चहुबाजूंकडून टीका झाली. असं होत असताना माजी मुख्यमंत्री आणि आताचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद द्या असं म्हटलं आहे. 

फडणवीस यांनी ट्विट करून मोदींच्या या आवाहनाला दुजोरा दिला आहे. 'एक समाज... एक जन.... एक राष्ट्र ....कोरोना विरोधातील लढाईत आपण एकटे नाही,तर सारे सोबत आहोत.
चला,5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता 9 मिनिटे आपण सारे आत्मबळाच्या एका अनोख्या प्रकाशपर्वात सहभागी होऊ या. मा. मोदीजी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊ या,अर्थात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळूनच!' असं म्हणत एक व्हिडिओ शेअर केला आहे. ('सर्वांनी एकावेळी वीज बंद केली तर विद्युतसंचावर परिणाम होईल') 

 

जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. असं असताना देशाची परिस्थिती पाहता मोदींनी दिवे लावण्याचं आवाहन नागरिकांना करावं हे काही अनेकांना रूचलं नाही. मोदींकडून काही वेगळ्या अपेक्षा होत्या. त्यांनी नागरिकांना घरी राहण्याचं आवाहन करायला हवं, सद्यस्थितीवर भाष्य करायला हवं होतं पण त्यांनी तसं न करता ही संधी साधत इव्हेंट करण्याचं ठरवलं, अशा ना ना प्रकारे त्यांच्यावर टीका झाली. ('पंतप्रधान असल्यासारखे मोदी वागणार आहेत का?')

मोदींवर जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, संजय राऊत यांसारख्या राजकीय मंडळींना टीका केलीच आहे. पण सोशल मीडियावर देखील मोदींवर या उपक्रमामुळे टीका होत आहे. जितेंद्र आव्हाडांनी देखील याबाबत मोदींवर टीका केली आहे.