Gram Panchayat Election Result : नोटाला सर्वाधिक मते, तरीही दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवणारा उमेदवार विजयी, मग नोटाचा उपयोग काय ?

Gram Panchayat Election Result 2022 : राज्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत दोन ठिकाणी नोटाला जास्त मतं मिळाली, दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवणारा उमेदवार विजयी 

Updated: Dec 22, 2022, 01:20 PM IST
Gram Panchayat Election Result : नोटाला सर्वाधिक मते, तरीही दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवणारा उमेदवार विजयी,  मग नोटाचा उपयोग काय ? title=

Gram Panchayat Election Result 2022 : राज्यात काल सात हजारांपेक्षा जास्त ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा (Grampanchayat Election) निकाल लागला. त्यापैकी दोन ठिकाणी उमेदवारांपेक्षा (Candidate) नोटाला (NOTA) जास्त मते मिळाली. कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्याच्या चंदगड तालुक्यातील कांगणी गावात ग्रामपंचायतची मतमोजणी झाली. वॉर्ड क्रमांक दोनमध्ये नोटोला सर्वाधिक म्हणजे 285 मते मिळाली. शितल अशोक कोरे या उमेदवाराला त्याखालोखाल म्हणजे 279 मते मिळाली. तर अमृता पाटील या उमेदवाराला 46 मते मिळाली. झालेल्या प्रकाराने सगळेच गोंधळात पडले. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवलेल्या शितल अशोक कोरे यांना विजयी घोषित केलं. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले.

पुणे जिल्ह्यातली तसाच प्रकार
दुसरीकडे पुणे (Pune) जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील म्हाकोशी गावातील वॉर्ड क्रमांक 1 मध्ये असाच प्रकार झाला. इथे नोटाला 104 मते मिळाली. तर दुसऱ्या क्रमांकाची 43 मते ही रेखा विजय साळेकर या उमेदवाराला मिळाली. त्यामुळे गावात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे काही वेळ निकाल राखून ठेवण्यात आला. मात्र नंतर दुस-या क्रमांकाची मते मिळवणाऱ्या उमेदवार रेखा विजय साळेकर या उमेदवाराला निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विजयी घोषित केलं.

दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळालेला उमेदवार विजयी
दोन्ही ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळालेल्या उमेदवाराला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विजयी घोषित केलं. हा निकाल देताना 2013 च्या निवडणूक आयोगाच्या आदेशाचा आधार घेत असल्याचं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितलं.  हा फक्त ग्रामिण भागासाठी नियम असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. 

मग 'नोटा'चा ऑप्शन का?
अधिकाऱ्यांच्या दृष्टीने तो निर्णय बरोबरही असेल. पण त्यामुळे काही प्रश्न उपस्थित होत आहेत. नोटा म्हणजे यापैकी एकही नाही असा अर्थ होतो, असं असताना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवणारा उमेदवार विजयी कसा काय घोषित केला जातो.  असंच होणार असेल तर मग नोटाचा ऑप्शन ईव्हीएममध्ये (EVM) कशासाठी दिला आहे. हाच नियम शहरासाठी वेगळा कसा काय असू शकतो ?  अशा ठिकाणची निवडणूक रद्द करुन आणि दुसरे उमेदवार देऊन पुन्हा निवडणूक का घेऊ नये ? याची उत्तरे निवडणूक आयोगाने दिली पाहिजेत. यातील जाणकार आणि संबंधितांनी यामध्ये लक्ष घालायला हवे.