मुंबईत कोरोनाचे ५७ रुग्णांची नोंद, राज्यातला आकडा ८१ वर

 आज दिवसभरात राज्यात ८१ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली

Updated: Apr 2, 2020, 09:43 PM IST
मुंबईत कोरोनाचे ५७ रुग्णांची नोंद, राज्यातला आकडा ८१ वर title=

मुंबई : संपूर्ण देशभरात कोरोना विरोधातील लढाई एकजुटीने सुरु आहे. केंद्र आणि सर्व राज्य सरकार मिळून कोरोनाशी दोन हात करत आहेत. देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. तरी कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी होण्याचे नाव घेत नाही. आज दिवसभरात राज्यात ८१ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबईत ५७ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत.

पुण्यात कोरोनाचे ६, पिंपरी चिंचवडमध्ये ३, नगरमघ्ये ९, ठाण्यात ५ तर बुलढाण्यात १ रुग्ण आढळला आहे. आत्तापर्यंत एकूण कोरोना बाधित रुग्णांचा आकडा ४१६ वर गेला आहे. यामध्ये १९ जणांचा मृत्यू झाला तर ४२ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत.

पंतप्रधानांच्या सूचना 

१. लॉकडाऊन संपविल्यानंतर १५ एप्रिलला लगेच लोक रस्त्यावर येऊन गर्दी  करणार नाहीत याचे नियोजन प्रत्येक राज्याने करावे. टप्याटप्याने लोक, वसाहती, भाग सुरु होतील हे पाहावे

२. देशात आत्तापर्यंत आपण कोरोनाला रोखण्यासाठी करीत असलेले प्रयत्न यशस्वी होताहेत असे दिसते पण खऱ्या अर्थाने आता लढाई सुरु झाली आहे. लॉकडाऊन संपले म्हणजे झाले असे नाही. आपल्याला सोशल डिस्टेनसिंग किंवा सामाजिक अंतर राखण्याचे पर्यटन ठेवणे महत्वाचे आहे. त्यासाठी मास्क पाहिजे असे नाही तर घरगुती चांगल्या कपड्याचा उपयोग होऊ शकतो. २१ दिवसांची तपस्या वाया जाऊ देऊ नका.
 
३. कोरोनाचा लढा सुरूच राहील पण शांती, सद्भाव, एकता  राखणे महत्वाचे आहे. कायदा व सुव्यवस्था टिकून राहील हे पहा. त्यासाठी ड्रोन  वगैरे तंत्रज्ञांचा उपयोग करा.

४.  कोरोनाचा मुकाबला हा फक्त डॉक्टर करीत नाहीत. एनसीसी, स्वयंसेवी संस्थांचे तरुण तडफदार युवक यांनाही सहभागी करून घ्या.

५. निवृत्त अधिकारी, निवृत्त वैद्यकीय अधिकारी, समाजातील काहीतरी योगदान देऊ इच्छिणारे व्यक्ती , तज्ञ , यांचे टास्क फोर्स तयार करा , त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या द्या

६. सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी उगाचच पॅकेजेसची घोषणा करू नका. हा लढा गांभीर्याने घ्यावयाचा आहे. सर्व राज्यांत यादृष्टीने  संतुलन हवे. दोन चार दिवस वृत्तपत्रांत प्रसिध्दही मिळेल पण कोरोनाचे संकट वास्तवात खूप मोठे आहे हे लक्षात ठेवा.

७. आता अनेक ठिकाणी पिकांची कापणी सुरु होईल . पण एकदम सर्व गर्दी होईल ग्रामीण भागात असे ए करू नका. त्याची विभागणी करा . शेतमाल मुख्य बाजारपेठेत आणण्यासाठी काही शेतकऱ्यांनी  वाहन ठरविल्यास खर्चही वाचेल आणि अनावश्यक गर्दी होणार नाही.

८. पीएम गरीब कल्याण बँक खात्यातली रक्कम काढायला गर्दी होते आहे, तशी गर्दी होऊ न देता नियोजन करा.

९. ११ हजार कोटी केंद्राने राज्याला द्यावयाचा हिस्सा आम्ही लगेच देत आहोत.

१०. आयुष्य मंत्रालयाने त्यांच्या संकेतस्थळावर आपली प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी दिलेले उपाय जरूर करा.

११. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी मोठ्या प्रमाणावर लोक मरण पावतील असे म्हटले आहे. चीनमध्येही कोरोना संसर्गाची प्रकरणे आढळताहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून थंडी सुरु होते. त्यामुळे विषाणूचा मुकाबला करण्याचे आव्हान आहे.