मुंबईच्या डबेवाल्यांना बाप्पा पावला, राज्य सरकारचं मोठं गिफ्ट... हक्काची घरं मिळणार

Mumbai Dabewala : मुंबईतल्या 2 लाखाहून अधिक कुटुंबांना हक्क्काचं घर मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यानंतर आता मुंबईतल्या डबेवाले आणि चर्मकार समाजातील बांधवांना हक्काची घर मिळणार आहेत. 

राजीव कासले | Updated: Sep 13, 2024, 02:00 PM IST
मुंबईच्या डबेवाल्यांना बाप्पा पावला, राज्य सरकारचं मोठं गिफ्ट... हक्काची घरं मिळणार title=

Mumbai Dabewala : मुंबईच्या डबेबाल्यांना गणपती बाप्पा पावला. राज सरकार (Maharashtra Government) डबेवाल्यांना मोठं गिफ्ट देणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यासोबतच्या बैठकीनंतर राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. पीएम आवास योजनेतून डबेवाल्यंना घरं दिली जाणार आहेत. यासाठी 12 हजार घरांची निर्मिती केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात आश्वासन दिलं होतं. त्यानुसार आता मुंबईच्या डबेबाल्यांना लवकरच हक्काची घरं (Affordable Houses in Mumbai) मिळणार आहेत.

डबेवाल्यांबरोबरच चर्मकार समाजातील बांधवांसाठीहीही या योजनेत घरं दिली जाणार आहेत. या योजनेसाठी प्रियांका होम्स रियालिटी 30 एकर जागा देणार आहे. तर नमन बिल्डर ना नफा ना तोटा तत्वावर घरांचं बांधकाम करणार आहे. 500 चौरस फुटांच्या 12000 घरांची निर्मिती केली जाणार आहे. डबेवाले आणि चर्मकार समाजाला 25 लाखात ही हक्काची घरं दिली जाणार आहे. डब्बेवाला आणि चर्मकार बंधू यांच्या स्वतःच्या घराचं स्वप्न 3 वर्षात पूर्ण होणार आहेत.

सह्याद्री अतिथीगृहावरील बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नमन बिल्डरचे जयेश शाह, प्रियांका होम्स रियालिटीचे रुद्रप्रताप त्रिपाठी, आमदार श्रीकांत भारतीय, डबेवाला संघटनेचे उल्हास मुके, चर्मकार निवारा असो. चे अशोक गायकवाड महाराज उपस्थित होते.

मुंबई डबेवाल्यांच्या संघटनेने शुक्रवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावर जाऊन भेट घेतली. यावेळी डबेवाल्यांना मुंबईतच घर देण्यासंदर्भात सामंज्यस करार करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत डबेवाल्यांना त्यांच्या हक्काची घरं मिळावीत यासाठी पाठपुरावा केला जात होता. त्या प्रयत्नांना अखेर यश आलं आहे.

मुंबईतल्या नोकरदारांचं दुपारचं जेवण हे मोठ्या प्रमाणात डबेवाल्यांवर अवलंबून आहे. मुंबईतल्या कार्यालयांमध्ये जेवण पोहचवण्याचं काम हे डबेवाले करत असतात. मुंबई डबेवाल्यांचा 130 वर्षाचा गौरवशाली इतिहास आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत लोकलची गर्दी, मुंबईचं ट्रॅफिक अशा साऱ्याच समस्यांतून रेल्वे आणि सायकलने ग्राहकांपर्यंत डबे पोहोचवण्याचे कठीण काम करणाऱ्या डबेवाल्यांच्या व्यवस्थापनाचे जगभर कौतुक झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही सेवा बिनबोभाटपणे सुरू आहे. 'ग्राहक हाच आमचा राजा आहे’ अशा वृत्तीने सेवा देण्याचे कार्य सुरू असते.