आता पावसाळ्यातही लोकल प्रवास होईल सुरळीत; मध्य रेल्वेने घेतला महत्त्वाचा निर्णय

Mumbai Local News Update:  मुंबई लोकलचे पावसाळ्यात बऱ्याचदा वेळापत्रक बिघडते. यावर आता रेल्वेने तोडगा काढला आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Apr 11, 2024, 12:01 PM IST
आता पावसाळ्यातही लोकल प्रवास होईल सुरळीत; मध्य रेल्वेने घेतला महत्त्वाचा निर्णय  title=
mumbai local garbage on tracks central railway will be built saftey wall

Mumbai Local News Update:  रेल्वे रुळांवर जमा होणारा कचरा ही रेल्वे प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. यातील थोडा जरी कचरा नाल्यात अडकला तर पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी साचते. रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळं वाहतूक सेवा ठप्प होते. त्यामुळं लोकलचे वेळापत्रक बिघडते. यावर तोडगा काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाने एक निर्णय घेतला आहे. 

मध्य रेल्वे रुळांवर पाणी साचू नये यासाठी सतत उपाययोजना करत असते. मात्र यावेळी मध्ये रेल्वेने रुळांवर फेकला जाणाऱ्या कचऱ्यावर कायमचा तोडगा काढला आहे. मध्य रेल्वे सीएसएमटी ते कल्याणपर्यंत रेल्वे रुळालगत असलेल्या भीतींवर आणखी एक सुरक्षेसाठी कपाउंड लावण्याच्या तयारीत आहे. जेणेकरुन जवळपासच्या भागात राहणारे लोक रेल्वे रूळांवर कचरा फेकणार आहेत. 

रेल्वे रुळांवर फेकला जाणाऱ्या कचऱ्यावर तोडगा काढण्यासाठी याआधी अशा प्रकारची भिंत विक्रोळी स्थानकात लावण्यात आली होती. या प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने टफन्ड मॉल्डिंग कंपोसाइट (TMC) संपूर्ण मार्गावर लावण्याचा निर्णय घेतला आहे. लोखंड किंवा स्टीलच्या जाळ्यांच्या तुलनेत TMC अधिक टिकाउ आणि स्वस्त आहे. रेल्वे प्रशासनाने म्हटलं आहे की, विक्रोळीजवळ सहावी रेल्वे मार्गिकेच्या जवळ रेल्वेच्या संरक्षित भिंतीजवळ पाच मीटरपर्यंत फेसिंग लावण्यात आली आहे. ही फेसिंग 100 मीटरपर्यंत लावण्यात आली आहे. 

सीएसएमटी ते कल्याणपर्यंत जवळपास 60 किमीच्या मार्गिकेवर TMC फेसिंग लावण्यात आली आहे. हे काम पुढच्या 6 महिन्यात पूर्ण होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनच्या आधी काही ठराविक व महत्त्वाच्या जागांवर ही संरक्षक जाळी बसवण्याचे काम प्राथमिक स्तरावर करण्यात येणार आहे. यात मस्जिद, डोंगरी, करी रोड, सायन, कुर्ला आणि भांडुप या स्थानकांत पहिले काम केले जाणार आहे. 

रेल्वे प्रशासनानुसार, रेल्वे रुळांवर फेकण्यात येणाऱ्या कचऱ्याची समस्या खूप जुनी आहे. अनेकदा कारवाई करुनही कचरा फेकण्यात येतोच. मध्य रेल्वेकडून दरवर्षी या समस्येसाठी 2.72 कोटींचा खर्च केला जातो. एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बसवण्यात येणाऱ्या संरक्षक जाळ्यांची रीसेल व्हॅल्यू खूप कमी आहे त्यामुळं चोरी होण्याचा कोणताच धोका नाहीये. 

मागील वर्षी 80 हजार मेट्रिक टन कचरा

रेल्वेने रुळांनजीक दोन्ही बाजूने भिंत बांधली आहे. खरं तर बी भिंत नसून स्टीलच्या पत्र्याचे कुंपण घातले आहे. 2023मध्ये रेल्वेने मान्सून पूर्व तयारीसाठी रुळाजवळील जवळपास 80 हजार मेट्रिक टन कचरा साफ केला आहे. या वर्षी मान्सून पूर्व कामे लवकर सुरू होणार आहेत. मध्य रेल्वेने कचरा साफ करण्यासाठी जुन्या लोकल ट्रेन कन्व्हर्ट केले आहेत. जे आता स्वच्छता रथ नावाने चालवल्या जातात. 6 डब्ब्याच्या या ट्रेनमध्ये जवळपास 60 टन कचरा प्रति कोच राहतो. कचरा रिसायकलिंग प्लांट 250 किलो प्रती दिन कचरा रिसायकल करण्याची क्षमता आहे.