मुंबईत कोरियन तरुणीचा विनयभंग, लाईव्ह स्ट्रीमिंगदरम्यान 2 तरुणांकडून छेडछाड

Korean Women Harrased in Mumbai:  या तरुणांचा उद्देश लक्षात येताच या तरुणीनं तिथून निघायचा निर्णय घेतला. पण...

Updated: Dec 2, 2022, 03:26 PM IST
मुंबईत कोरियन तरुणीचा विनयभंग, लाईव्ह स्ट्रीमिंगदरम्यान 2 तरुणांकडून छेडछाड title=

मनोज कुळकर्णी, झी मीडिया, मुंबई :  मुंबईत (Mumbai) एका कोरियन तरुणीचा विनयभंग करण्यात आला ( Korean Women Youtuber Molested in Mumbai ) . याप्रकरणी मोबीन शेख आणि मोहम्मद अन्सारी या दोन विकृतांना अटक करण्यात आली. नेमकं काय घडलं. पाहुयात एक रिपोर्ट. अतिथी देवो भव. अर्थात येणारा पाहुणा हा देवासमान असतो अशी भारताची संस्कृती आहे. अतुल्य भारत अशी पर्यटनविभागाची टॅगलाईन आहे. पण याच प्रतिमेला तडा जाईल अशी एक घटना मुंबईच्या खार परिसरात घडलीय. एक कोरियन यूट्यूबर खार रोड मशीद परिसरात लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून व्हीडीओ करत होती. त्याचवेळी मोबीन चांद मोहम्मद शेख आणि मोहम्मद नकीब सदरेआलम अन्सारी हे विकृत तरुण त्याठिकाणी आले. सुरुवातीला ड्रेस-ड्रेस म्हणत हे तरुण लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये घुसले आणि तरुणीला काही कळायच्या आतच तिचं चुंबन घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला. (mumbai police arrest to 2 who harres korean foreigner woman)

शेख आणि अन्सारी या तरुणांचा उद्देश लक्षात येताच या तरुणीनं तिथून निघायचा निर्णय घेतला पण मोबीन शेख आणि मोहम्मद अन्सारी हे तरुण काही तिचा पिच्छा सोडायला तयार नव्हते..बाईकवरुन दोघेही या कोरियन तरुणीच्या मागे आले आणि तिला बाईकवर बस असं सांगायला लागले.

पण तरुणीनं प्रसंगावधान दाखवत समोरच आपलं हॉटेल असल्याचं सांगितलं आणि स्वत:ची सुटका करुन घेतली. या प्रकाराचा व्हिडीओ तिथल्या काही उपस्थितांनी ट्विटरवर टाकला आणि मुंबई पोलिसांना टॅग केलं. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी अवघ्या 12 तासांत मोबीन शेख आणि मोहम्मद अन्सारीला अटक केली. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनीही दोषींवर कठोर कारवाईची मागणी केलीय. तर या गंभीर घटनेची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही घेतली. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल शिंदेंनी म्हटलंय.

परदेशी नागरिकांना सुरक्षित वाटावं म्हणून पर्यटन विभाग अतुल्य भारतसारखी योजना राबवतोय, जगभरातल्या पर्यटकांना उत्तम सोयी मिळाव्या आणि भारतात सुरक्षित वाटावं यासाठी पावलं उचलतोय. पण मोबीन शेख आणि मोहम्मद अन्सारीसारख्या विकृतांमुळे जागतिक पर्यटकांच्या नजरेत भारताच्या प्रतिमेला तडा जातोय..त्यामुळेच जगभरात भारताविषयी योग्य देण्यासाठी दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी होतेय.