#MumbaiRains : नवाब मलिकांच्या घरातही साचलं पाणी

शिवसेनेला टोला देत मलिक म्हणाले.... 

Updated: Jul 2, 2019, 09:17 AM IST
#MumbaiRains : नवाब मलिकांच्या घरातही साचलं पाणी title=
छाया सौजन्य- फेसबुक

मुंबई : मुंबईत सुरु असणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे सेवा आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यासोबतच नेतेमंडळींनाही बसला आहे. जवळपास ४८ तासांहून अधिक काळ सुरु असणाऱ्या पावसामुळे मुंबईची लाईफलाईन एकिकडे ठप्प झाली तर, दुसरीकडे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं. राष्ट्रवादी काँग्रेस नेते, प्रवक्ते नवाब मलिक यांनाही हा त्रास सहन करावा लागला आहे. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून मलिक यांनी त्यांच्या घरात पाणी साचल्याचे काही फोटो पोस्ट केले. माझं घर.... असं लिहित त्यांनी घरातील काही फोटो पोस्ट केले. या पोस्टमध्ये त्यांच्या घरात गुडघ्यांपर्यंत पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे. मलिक यांनी 'करुन दाखवलं' असं लिहित या पोस्टच्या माध्यमातून शिवसेनेला टोला लगावला आहे. ज्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलं आहे. 

मलिक यांच्या घरातील हे चित्र पाहता पावसाचटा फटका हा सर्व स्तरावर पाहायला मइळत आहे. शिवा. पुन्हा एकदा पालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्हं उभं राहात आहे. 

'झी २४तास'शीसंवाद साधताना मलिक यांनी या सर्व प्रकरणी संताप व्यक्त केला. सत्ताधाऱ्यांनीच मुंबईकरांची, सर्वसामान्यांची ही अवस्था केली असं म्हत त्यांनी नाराजीचा सूर आळवला. मुंबईत ठिकठिकाणी सुरु असणारी मेट्रो प्रकल्पाची कामं आणि त्यामुळे रोखले गेलेले नाले या साऱ्यामुळेच पाणी साचण्याच्या घटना घडत असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. 'निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांना मतं मिळाली, पण सर्वसामान्यांचे प्रश्न मात्र अद्यापही दुर्लक्षितच आहेत. झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्यांचे जीव धोक्यात असताना सत्ताधऱ्यांना मात्र काहीच फरक पडत नाही', असे खडे बोल त्यांनी शिवसेना आणि भाजपला सुनावलं. 

नालेसफाईचा दावा खरा की खोटा? 

मलिक यांच्या घरातील हे चित्र पाहता पावसाचा फटका हा सर्व स्तरांवर पाहायला मिळत आहे. मुख्य म्हणजे पुन्हा एकदा पालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्हं उभं राहात आहे. कोट्यवधींचा खर्च करुन नालेसफाईची कामं पूर्ण झाल्याचा दावा मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आला होता. पण, आता मात्र या दावा खरा की खोटा असाच प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

सोमवारी माध्यमांशी संवाद साधताना मुंबईत पाणी साचलंच नाही, असं म्हणत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी यंदाच्या वर्षी जवळपास ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत नालेसफाईचं काम झाल्याची माहिती दिली. पण, सद्यस्थिती पाहता प्रशासनाच्या या दाव्यांवर वारंवार प्रश्नचिन्हं उभं राहत आहे.