ओखी चक्रीवादळाचं संकट अखेर दूर

ओखी चक्रीवादळाचं मुंबई आणि कोकणकिनारपट्टीवरचं संकट आता दूर झालं आहे. पण जाता जाता ओखीच्या प्रभावानं मुंबापुरीला ऐन हिवाळ्यात अक्षरशः धूवून काढलं. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 6, 2017, 02:54 PM IST
ओखी चक्रीवादळाचं संकट अखेर दूर title=

मुंबई : ओखी चक्रीवादळाचं मुंबई आणि कोकणकिनारपट्टीवरचं संकट आता दूर झालं आहे. पण जाता जाता ओखीच्या प्रभावानं मुंबापुरीला ऐन हिवाळ्यात अक्षरशः धूवून काढलं. 

गेल्या चोवीस तासात मुंबईत जवळपास 100 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. डिसेंबर महिन्यातला 142 वर्षांतला हा सर्वाधिक पाऊस होता. आता मात्र ओखीचं संकट दूर झालं आहे. महाराष्ट्रासह, गुजरातवरचाही ओखीचा धोका टळला आहे.

ओखी चक्रीवादाळामुळे मुंबई शहर तसेच उपनगरात पावसानं हजेरी लावली आहे. नवी मुंबई, ठाणे, कल्याण, अंबरनाथमध्येही पाऊस बरसला. वादळामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग वाढला होता. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला होता. दरम्यान, मुंबईला 'ओखी'चा धोका लक्षात घेत, गिरगाव चौपाटीवर जीवरक्षकांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

ओखी चक्रीवादळाच्या तडाख्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मुंबईसह कोकण किनारपट्टीच्या परिसरातल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती.