अंबानी कुटुंबाला नाही कोणता धोका, संशयित निघाले गुजरातमधील टुरिस्ट

, मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला एका टॅक्सी चालकाचा फोन आला होता. 

Updated: Nov 9, 2021, 11:02 PM IST
अंबानी कुटुंबाला नाही कोणता धोका, संशयित निघाले गुजरातमधील टुरिस्ट title=

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घरातील अँटिलियाची सुरक्षा सोमवारी वाढवण्यात आली आहे. एका माहितीनुसार, मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला एका टॅक्सी चालकाचा फोन आला होता. ज्यामध्ये ड्रायव्हरने सांगितले की काही दोन लोक अँटिलियाच्या लोकेशनबद्दल विचारत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या टॅक्सी ड्रायव्हरने ही माहिती दिली त्यांनी ते दोघे जण असल्याचे सांगितले. त्यांच्यामध्ये एक दाढी असलेला माणूस होता. दोघांकडे बॅगही होती. या माहितीनंतर पोलिसांनी त्या भागातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले.

असे सांगितले जात आहे की सोमवारी गुजरातमधील कच्छ येथून तीन लोक आले होते, त्यांनी गेटवे ऑफ इंडियासारख्या पर्यटन स्थळांना भेट दिली आणि इतर ठिकाणेही पाहायची होती. त्यामुळे त्याच्या टुरिस्ट कारच्या ड्रायव्हरने दुसऱ्या कॅब ड्रायव्हरला अँटिलियाचा पत्ता विचारला. कॅब ड्रायव्हरने आधी त्याला ऑनलाइन शोधण्यास सांगितले, पण नंतर मार्ग सांगितला. अशा परिस्थितीत ते सर्व पर्यटक अँटिलिया पाहण्यासाठी आले आणि त्यानंतर सोमवारीच गुजरातला रवाना झाले.

त्यानंतर कॅब चालकाला संशय आला आणि त्याने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. या प्रकरणात, मुंबई पोलिसांनी सोमवारी रात्री संशयित पर्यटक कारच्या चालकाचा शोध घेतला असता, कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाले. वाशी येथून ताब्यात घेतलेल्या चालकाचा कोणताही गुन्हेगारी इतिहास नसल्यामुळे त्याला सोडून देण्यात आले.

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी हे मुंबईतील 27 मजली अँटिलियामध्ये आपल्या कुटुंबियांसोबत राहतात. यावर्षी 25 फेब्रुवारी रोजी अँटिलियाच्या बाहेर जिलेटिनच्या कांड्यांनी भरलेली कार सापडली होती. त्या वाहनात एक धमकीची चिठ्ठीही सापडली होती, ज्यामध्ये अंबानी कुटुंबाला धमकी देण्यात आली होती. या प्रकरणावरून महाराष्ट्राच्या राजकारणातही खळबळ उडाली होती.

तपासात हे वाहन मनसुख हिरेन नावाच्या व्यावसायिकाचे असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांनी आठवडाभरापूर्वीच कार चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र हे प्रकरण उजेडात आल्यानंतर आठवडाभरानंतर मनसुख हिरेंचा मृतदेह मुंब्रा खाडीत सापडला. या संपूर्ण प्रकरणाचा कट रचल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेचे एपीआय सचिन वाजे याला अटक करण्यात आली. जो अजूनही तुरुंगात आहे. त्याला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले.