वरुणराजा मुंबईकरांवर उदार, तलाव भरू लागले

हे संकेत तर.... 

Updated: Jul 9, 2019, 07:28 AM IST
वरुणराजा मुंबईकरांवर उदार, तलाव भरू लागले title=
संग्रहित छायाचित्र

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : गेले दोन आठवडे सुरु असणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांना दिलासा मिळत आहे. दमदार कोसळत असणाऱ्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणा-या सातही तलावांमधील पाणीसाठा ५ टक्क्यांवरून २५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. 

विशेष म्हणजे तलाव क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस होत असमुळे हा पाणीसाठा वाढू लागला आहे. उन्हाल्याच्या दिवसांमध्ये अक्षरश: तळ गाठलेल्या  य़ा तलावांमुळे शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्याची चिंता वाढली होती, पण आता मात्र समाधानकारक पाऊस होत असल्यामुळे शहरवासियांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मुख्य म्हणजे पावसाचं प्रमाण असंच राहिलं असता येत्या काही दिवसांमध्ये मुंबईकरांवर असणारं पाणीकपातीचं संकटही टळण्याची चिन्हं आहेत. 

सोमवार सकाळपर्यंत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये एकूण ३ लाख ६० हजार दशलक्ष लीटर पाणीसाठा झाला असल्याची माहिती मिळाली. सातही तलावांची पाणी साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर इतकी आहे. परिणामी सर्व तलाव भरण्यास आणखी दहा लाख ८७ हजार दशलक्ष लिटरने जलसाठा वाढण्याची गरज आहे. 

सध्याचा जलस्तर

तलाव जलसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)   
मोडक सागर- ६९०५८   
तानसा  - ५६५६४ 
विहार- १२८२५
तुळशी -६७६४
भातसा -१३९७३३
मध्य वैतरणा -७५९८२
एकूण - ३६०९२५