अनिल देशमुखांच्या गृहमंत्रीपदावर सामनातून प्रश्नचिन्ह

'संशयाच्या कोंडाळ्यात राहून गृहमंत्रीपदावरील व्यक्तीस काम करता येत नाही'

Updated: Mar 28, 2021, 02:06 PM IST
अनिल देशमुखांच्या गृहमंत्रीपदावर सामनातून प्रश्नचिन्ह title=

मुंबई : अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले असे विधान शिवसेनेचे  (Shivsena) मुखपत्र असलेल्या सामनातून (Samana) करण्यात आलंय. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी पद स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर शरद पवारांनी अनिल देशमुख यांच्याकडे जबाबदारी दिल्याचे सामनातून म्हटलंय. गृहमंत्री पदाची एक प्रतिष्ठा आहे. संशयाच्या कोंडाळ्यात राहून गृहमंत्रीपदावरील व्यक्तीस काम करता येत नाही असा चिमटा सामनातून काढण्यात आलाय. 

वाझे प्रकरणानंतर सरकार बॅकफूटवर गेले. पोलीस निरीक्षक असलेल्या वाझेला अमर्याद अधिकार कोणाच्या आदेशाने दिले ? असा प्रश्न सामनातून उपस्थित करण्यात आलाय. पोलीस आयु्क्तालयात बसून वाझे वसुली करत होता तर गृहमंत्र्यांकडे याबाबत माहिती का नव्हती ? असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आलाय. 

अनिल देशमुखांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत कारण नसताना पंगा घेतला. गृहमंत्र्यांची भूमिका सौ लोहार की, एक सोनार की अशी असायला हवी. पोलीस खात्याचे नेतृत्व हे कणखर असावे आणि हा कणखरपणा प्रामाणिकपणातून येतो असेही सामनातून म्हटलंय. 

परमबीरसिंह यांच्या आरोपानंतर गृहमंत्रीपद आणि राज्यसरकारचे वाभाडे निघाले. त्यावेळी एकही मोठा मंत्री बचावासाठी आला नाही. लोकांना सुरुवातीला त्यांचे आरोप खरे वाटले. कारण सरकारकडे डॅमेज कंट्रोल नावाची यंत्रणा नाहीय असेही सामनातून म्हटलं गेलंय.