लडाखमधील परिस्थिती गंभीर; देशात वास्तवापेक्षा वेगळे चित्र रंगवले गेलेय- शिवसेना

४०-५० चिनी एपवर बंदीची कुऱ्डाड चालवून आपण चीनला आर्थिक तडाखेदेखील दिले आहेत. त्यामुळे चीन काही प्रमाणात का होईना, नरमला असे फिल गुड वातावरण देशभरात निर्माण झाले.

Updated: Aug 28, 2020, 07:50 AM IST
लडाखमधील परिस्थिती गंभीर; देशात वास्तवापेक्षा वेगळे चित्र रंगवले गेलेय- शिवसेना title=

मुंबई: गलवान खोऱ्यातील भारत आणि चीन यांच्यातील संघर्षानंतर  मोदी सरकारने उचललेल्या पावलांमुळे देशात 'फिल गुड' वातावरण निर्माण झाले. अनेकांना चीन नरमला असे वाटले. मात्र, प्रत्यक्षात लडाखमधील परिस्थिती खूपच गंभीर असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. देशाचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी लडाखमधील सद्यपरिस्थिती गंभीर असल्याचे मत नुकतेच व्यक्त केले होते. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून या साऱ्या प्रकरणावर भाष्य करण्यात आले आहे. 

एस. जयशंकर यांच्या म्हणण्यानुसार, १९६२ नंतर  प्रथमच इतकी नाजूक व गंभीर परिस्थिती ओढावली आहे. गेल्या दोन महिन्यांत चिनी सीमेवर लडाखपासून अरूणाचलपर्यंत आपणही लष्कराची जमवाजमव केली. आपल्या लष्करप्रमुखांनी सीमाभागाला भेटी दिल्या आहेत. पंतप्रधानांनीदेखील लडाखला भेट देऊन आपल्या जवानांचे मनोबल वाढवले. राफेल विमानांनी सीमारेषेवर घिरट्या घालून चिनी ड्रॅगनला इशारा दिला आहे. दुसऱ्या बाजूला ४०-५० चिनी एपवर बंदीची कुऱ्डाड चालवून आपण चीनला आर्थिक तडाखेदेखील दिले आहेत. त्यामुळे चीन काही प्रमाणात का होईना, नरमला असे फिल गुड वातावरण देशभरात निर्माण झाले. मात्र, एस. जयशंकर यांच्या विधानाने या वातावरणाला धक्का बसू शकतो. लडाख सीमेवरील नेमके चित्र कसे आहे, हे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. तणाव कमी झाला असे वरकरणी भासत असले तरी वस्तुस्थिती वेगळी आहे, असे अग्रलेखात म्हटले आहे. 

गलवान खोऱ्यातील भारत-चीन यांच्यातील संघर्षानंतर देशभरात संतप्त वातावरण निर्माण झाले होते. या मुद्द्यावर काँग्रेस वगळता इतर विरोधी पक्षांनी आपण मोदी सरकारच्या पाठिशी ठामपणे उभे असल्याचे म्हटले होते. मात्र, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लडाखमधील परिस्थिती आलबेल नसल्याचे वारंवार सांगितले होते. यावरून भाजप नेते बरेच आक्रमकही झाले होते. परंतु, राहुल गांधी यांनी भारत-चीन मुद्द्यावरून मोदी सरकारला जाब विचारणे सुरुच ठेवले होते. यानंतर शिवसेनेनेही आता असाच काहीसा सूर आळवला आहे. त्यामुळे भविष्यात या मुद्द्यावरून राजकारण तापणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.