जलयुक्त शिवारात गैरव्यवहार झाल्याचं सरकारकडून मान्य

जलयुक्त शिवाराच्या कामांत अनियमितात झाल्याची कबुली 

Updated: Jun 24, 2019, 02:00 PM IST
जलयुक्त शिवारात गैरव्यवहार झाल्याचं सरकारकडून मान्य title=

अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : राज्यात जलयुक्त शिवारच्या कामात गैरव्यवहार झाल्याचे जलसंधारण विभागाने मान्य केलं. विधानपरिषदेत आज प्रश्नोत्तराच्या तासात या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला असतांना राज्य सरकारने जलयुक्त शिवाराच्या कामांत अनियमितात झाल्याची कबुली दिली आहे. बाळासाहेब चौधरी यांनी पुरंदर तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेत अनियमितता झाली असल्याची तक्रार केली होती. तेव्हा संबंधित प्रकणाबाबात लाचलुचपत प्रतिबंध विभागाने गुप्त चौकशी करुन तक्रारीत तथ्य असल्याचं नमुद केल्याची माहिती लेखी उत्तरात देण्यात आली आहे.

दरम्यान या सर्व प्रकरणाची खुली चौकशी करणार का असा प्रश्न विधानपरिषद विरोधीपक्षनेते धनंयज मुंडे यांनी उपस्थित केला. तेव्हा जिथे अनियमितता असल्याच्या तक्रारी आहेत अशी राज्यभरातील सुमारे 1300 जलयुक्त शिवारची कामं निवडली आहेत. जिथे जिल्ह्याबाहेरच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करून विभागीय चौकशी सुरू केल्याची माहिती जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी दिली. याबाबत तांत्रिक अहवाल आल्यावरच या प्रकरणात ACB चौकशी करायची की नाही हा निर्णय घेऊ असं जलंसधारण मंत्र्यांनी स्पष्ट केलं. याबाबत विरोधी पत्रांनी तीव्र आक्षेप नोंदवला. 

मात्र या प्रश्नाच्या निमित्तानं प्रथमच जलयुक्त शिवारमध्ये अनियमितता झाली असून त्याबाबत चौकशी सुरु असल्याचं राज्य सरकारने जाहीरपणे मान्य केलं आहे.