राज्यासाठी आतापर्यंतची सर्वांत दिलासादायक बातमी; लवकरच दुसरी लाट ओसरणार

 राज्याच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. तात्याराव लहाने यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे.

Updated: May 3, 2021, 03:09 PM IST
राज्यासाठी आतापर्यंतची सर्वांत दिलासादायक बातमी; लवकरच दुसरी लाट ओसरणार title=

दीपक भातुसे, झीमीडिया, मुंबई : राज्यात कोरोनाच संसर्गामुळे रुग्णांना बिकट परिस्थितीचा सामना करावा लागतोय. कोरोनाची दुसरी लाट आता कधी कमी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याविषयी राज्याच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. तात्याराव लहाने यांनी माहिती दिली आहे.

कोरोनाची दुसरी लाट कमी होणार
लॉकडाऊन लागू केल्यानंतर कोरोना रुग्ण वाढीचा दर सध्या स्थिर आहे. काल राज्यात ५६ हजार संख्या होती, ही संख्या अशीच स्थिर राहिली किंवा खाली येऊ लागली तर आलेख खाली येतोय असं म्हणावे लागेल. कोरोना १६ फेब्रुवारी रोजी अमरावतीत आला. जगातील इतर देशांच्या अभ्यासानुसार कोरोना ९० दिवसांनी कमी होत असतो. त्यामुळे १५ मे ते २५ मे च्या दरम्यान कमी होताना दिसेल. 

प्रत्येक तीन महिन्यात नवीन स्ट्रेन येत असतो.
 नागपूरात ५ स्ट्रेन आढळले आहेत.  हा विषाणू दोन प्रकारे पाहिला पाहिजे. आपल्या देशात ५ नव्हे तर १ हजार स्ट्रेन आढळले आहेत. आपल्याला फक्त हे बघायचं आहे की हा स्ट्रेन जास्त संसर्ग वाढवणारा आहे का? तो शरीरावर जास्त परिणाम करणारा आहे का?असे स्ट्रेन प्रत्येक ३ महिन्यांनी मिळत असतात. त्यामुळे या नव्या स्ट्रेनचा अभ्यास आम्ही करत आहोत 

तिसर्‍या लाटेत लहान मुले बाधीत होण्याचा अंदाज
पहिल्या लाटेत ५० वयाच्या वरील लोक बाधीत झाले, दुसर्‍या लाटेत २० वर्षाच्या वरील तरुण बाधित झाले, आता १८ वर्षापर्यंत लसीकरण होणार आहे, त्यामुळे त्यांना संरक्षण मिळणार आहे. राहिलेले १२ ते १८ वयोगटातील मुलं तिसर्‍या लाटेत बाधीत होतील असा अंदाज आहे.

 जास्त मृत्यूदर असलेल्या १० जिल्ह्यात मृत्यूदर आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न 

- या जिल्ह्यात रुग्णालयात लोक उशीरा येत असल्याने मृत्यू जास्त होत आहेत. 
- कोरोना लागण झाली की लगेच रुग्णालयात जा याबाबत जनजागृती केली जात आहे. 
- प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर यांनाही सूचना देण्यात आल्या आहेत की रुग्णांना लवकरात लवकर रुग्णालयात पाठवा 
- जेणे करून त्यांच्यावर उपचार करता येतील आणि मृत्यूदर कमी करता येईल