असे कराल अंगारकी संकष्टीचे व्रत

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अंगारकी संकष्टी चतुर्थी आल्याने ह्या वर्षाची सुरवात अतिशय भक्तीभावाने झाली आहे. संकष्टीचे व्रत कसे करावे असा प्रश्न साऱ्यांनाच पडलेला असतो.

Updated: Jan 1, 2013, 08:44 AM IST

www.24taas.com, मुंबई
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अंगारकी संकष्टी चतुर्थी आल्याने ह्या वर्षाची सुरवात अतिशय भक्तीभावाने झाली आहे. संकष्टीचे व्रत कसे करावे असा प्रश्न साऱ्यांनाच पडलेला असतो. त्यामुळे ह्या व्रताबद्दल जाणून घ्या. "संकष्टी चतुर्थी" हा श्रीगणपतीच्या उपासनेचा दिवस. दिवसभर उपोषण करुन, रात्रौ चंद्रोदयाच्या वेळी श्रीगणपतीची पूजा करुन, चंद्रदर्शन घेऊन उपोषण सोडावयाचे. अशी या व्रताची थोड्क्यांत पाळ्णूक आहे.
" श्रीसंकष्टहरगणपती" हे या व्रताच्या देवतेचे नांव आहे, हे व्रत करणार्‍या स्त्री अगर पुरुषाने, व्रताला सुरुवात श्रावण महिन्यातील संकष्टीच्या दिवशी करावी. सतत २१ संकष्ट्या करुन व्रताचे उद्यापन करावे. काहीजण इच्छा पूर्ण होईपर्यंत तर बहुतेकजण सततच संकष्टीचा उपवास करतात. संकष्टी करणार्‍यांनी उपोषण सोड्ण्यापूर्वी नेहमी, पुढे दिलेले "संकष्टी चतुर्थी महात्म्य" अवश्य वाचावे. संकष्टचतुर्थीचे व्रत करणाराने त्यादिवशी पाण्यात काळे तीळ टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी. दिवसभर गणेश चिंतन करुन उपवास करावा. आवश्यकतेनुसार उपवासास चालणारे पदार्थ खावे. दिवसभर आपला उद्योग-धंदा करावा.
संध्याकाळी / रात्रो आवश्यक वाटल्यास आंघोळ करावी. नंतर स्वच्छ पाटावर अगर चौरंगावर तांदूळ अगर गव्हाची लहानशी रास करावी, त्यावर स्वच्छ पाण्याने भरलेला कलश (तांब्या) ठेवावा; कलशाभोवती दोन वस्त्रे गुंडाळावी, त्यावर ताम्हन ठेवून त्यात "श्रीसंकष्टहर गणपतीची" स्थापना करावी. ( श्रीगणपतीची सोने, चांदी,तांबे वगैरे धातूची मूर्ती अगर तसबीर) त्याची षोडोपचारे पूजा करावी. पूजा करणाराने अंगावर लाल वस्त्र घ्यावे. पूजेत वाहायचे "गंध-अक्षता-फ़ूल-वस्त्र" तांबड्या रंगाचे असावे.पूजेत उपचार अर्पण करताना, लंबोदराय नम: म्हणून गंध, कामरुपाय नम:म्हणून अक्षता, सिद्धिप्रदाय नम: म्हणून पुष्पसर्वार्थसिद्धिदाय नम: म्हणून फ़ळ, शिवप्रियाय नम: म्हणून वस्त्र, गणाधिपाय नम: म्हणून उपवस्त्र, गजमुखाय नम: म्हणून धूप, मूषकवाहनाय नम: म्हणून दीप, विप्रनाथाय नम: म्हणून नैवेद्य आणि धनदाय नम: म्हणून दक्षिणा अर्पण करावी. पूजा झाल्यावर पूढील ध्यानमंत्र म्हणून "श्रीसंकष्टहरगणपतीचे" ध्यान करावे.
रक्तांग रक्तवस्त्रं सितकुसुमगणै: पूजितं रक्तगंधै:॥
क्षीराब्धो रत्नदीपे सुरतरुविमले रत्नसिंहासनस्थम् ॥
दोर्भि: पाशांकुशेष्टा भयध्रुतिरुचिरं चंद्रमौलिं त्रिनेत्रं ॥
ध्यायेच्छांत्यर्थमीशं गणपतीममलं श्रीसमेतं प्रसन्नम् ॥
नतंर आपले संकट निवारण्याची व मनोकामना पूर्ण करण्याची प्रार्थना करावी.
मम समस्तविघ्ननिवृत्त्यर्थ संकष्टहरगणपतीप्रीत्यर्थ चतुर्थीव्रतांगत्वेन
यथा मीलोतोपचार द्रव्यै: षोडोपचारे पूजां करिष्ये ॥
असे म्हणावे. नंतर पुढे दिलेले " संकष्ट चतुर्थी महात्म्य " वाचावे. २१ मोदकांचा नेवैद्य दाखवून आरती करावी. आरती झाल्यावर -
अशुद्धमतिरिक्तं वा द्रव्याहीनं मया कृतम् ।
तत सर्व पूर्णतां यातु विप्ररुप गणेश्वर ॥
असे म्हणून साष्टांग नमस्कार घालावा. नंतर चन्द्रदर्शन करुन , चंद्राला अर्घ्य (पाणी) , गंध,अक्षता, फ़ूले वाहून त्याची पूजा करावी. "रोहिणीनाथाय नम:" म्हणून नमस्कार करावा. नंतर उपोषण सोडावे. जेवणांत मोदक असावे,गोड पदार्थ असावेत, खारट आंबट पदार्थ नसावेत. [ चंद्रोदयाची वेळ पंचांगांत दिलेली असते.] जेवण झाल्यानंतर उत्तर पूजा करुन मूर्ती अगर तसबीर उचलून ठेवावी. धान्य वापरात घ्यावे. पाणी तुळशीत ओतावे.