हताश कमल हसननं दिली देश सोडण्याची धमकी...

अभिनेता कमल हसननं ‘मला न्याय मिळाला नाही तर मी देश सोडून निघून जाईन’ असा धमकीवजा इशाराच कमल हसननं दिलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 30, 2013, 01:31 PM IST

www.24taas.com, मुंबई

‘विश्वरुपम’ सिनेमाला तामिळनाडूमध्ये कोर्टाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतरही चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. यामुळे निराश झालेल्या अभिनेता कमल हसननं ‘मला न्याय मिळाला नाही तर मी देश सोडून निघून जाईन’ असा धमकीवजा इशाराच कमल हसननं दिलाय.

अभिनेता कमल हसनचा बहुचर्चित सिनेमा ‘विश्वरुपम’ अजूनही वादाच्या भोवऱ्यात आहे. कोर्टानं हिरवा कंदील दाखवल्यानं जवळपास दोन आठवड्यानंतर अखेर मंगळवारी कोलकत्तामध्ये हा सिनेमा रिलीज झाला. मात्र, पुन्हा एकदा हा सिनेमा बंद पाडण्यात आला. तामिळनाडू सरकारने याविरोधात पुन्हा अपिल केलंय. ही सारी राजकीय खेळी असल्याचं सांगत शेवटपर्यत आपण लढत राहणार असल्याचं मत कमल हसनने व्यक्त केलंय.
इतकंच नाही तर ‘सिनेमाला होत असलेल्या मुस्लिम कम्युनिटीचा विरोध पाहता मी धर्मनिरपेक्ष देशात राहणं पसंत करेन आणि जर गरज पडली तर हा देशही सोडेन’ अशी हताश भावना कमल हसननं व्यक्त केलीय. ‘एक सिनेमा देशाची एकता कशी काय तोडू शकतो. काश्मीरपासून ते केरळपर्यंत सगळ्याच राज्यांत हा सिनेमा प्रेक्षक पाहत आहेत. मी राजकीय पक्षांचं एक प्यादं बनून राहिलोय’ असंही त्यानं म्हटलंय.

दक्षिणेत कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश या राज्यांत मात्र हा सिनेमा प्रदर्शित झालाय. पण, तामिळनाडू सरकारचा या सिनेमाला विरोध मात्र अजूनही कायम आहे. सिनेमाच्या निर्मितीसाठी जवळजवळ १०० करोड रुपये खर्च झालाय.