नव्या दोस्तीची नवी गोष्ट 'दिल दोस्ती दोबारा'

‘मस्ती नाय तर दोस्ती नाय’ हा अफलातून फंडा सांगत आपल्या मैत्रीने अवघ्या तरुणाईला वेड लावत सर्वांच्या मनात घर करणारी मालिका म्हणजे दिल दोस्ती दुनियादारी. 

Updated: Feb 9, 2017, 08:39 AM IST
नव्या दोस्तीची नवी गोष्ट 'दिल दोस्ती दोबारा' title=

मुंबई : ‘मस्ती नाय तर दोस्ती नाय’ हा अफलातून फंडा सांगत आपल्या मैत्रीने अवघ्या तरुणाईला वेड लावत सर्वांच्या मनात घर करणारी मालिका म्हणजे दिल दोस्ती दुनियादारी. झी मराठी वाहिनीवरुन प्रसारित झालेल्या या मालिकेने आणि यातील कलाकारांनी सर्वच प्रेक्षकांना आपलंसं केलं.

या मालिकेचा पहिला सिझन संपल्यानंतर पुढचा सिझन कधी येणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात खूप उत्सुकता होती. या नव्या सिझनची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. त्यांची ही उत्सुकता आता संपणार आहे कारण ही दोस्ती त्यांच्या भेटीला परत येतेय पण एका नव्या नावासोबत आणि एका नव्या फ्रेश गोष्टीसह. ‘दिल दोस्ती दोबारा’ असं या नव्या सिझनचं नाव असून येत्या १८ फेब्रुवारीपासून रात्री १०.३० वा. झी मराठीवरुन ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

‘दिल दोस्ती दोबारा’ मालिकेची नवी गोष्ट माजघरात नाही तर एका वेगळ्याच ठिकाणी रंगणार आहे हे ठिकाण आहे एक रेस्टॉंरंट म्हणजेच उपहारगृह. ‘खयाली पुलाव रेस्टॉरंट’ असं त्याचं नाव असून हे सहा जण तिथे एकत्र कसे येणार हे बघणं मजेशीर ठरणार आहे. पहिल्या सिझनमध्ये आशू, सुजय, कैवल्य, मीनल, रेश्मा आणि अॅना हे सहा जण एकमेकांच्या ओळखीने एका घरात एकत्र येतात आणि त्यांची ही ओळख कधी घट्ट मैत्री बनते हे त्यांनाही कळत नाही. 

या मैत्रीने प्रेक्षकांना खळखळून हसवलं आणि कधी कधी त्यांच्या डोळ्यांच्या कडाही ओल्या केल्या. आता या नव्या सिझनमध्ये ही मंडळी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत परंतु नव्या व्यक्तिरेखांसह. साहिल, गौरव, पप्या, मुक्ता, आनंदी आणि परी अशा या सहा व्यक्तिरेखा असणार आहेत. हे सहा जण मुंबईत एकमेकांना कसे भेटतात आणि ‘खयाली पुलाव रेस्टॉरंटचा’ प्रवास कसा सुरु होतो त्याची ही गोष्ट. या कामाचा कोणताही पूर्वानुभव नसलेले हे सगळे हे काम कशाप्रकारे करतात ? यात त्यांना येणा-या अडचणींचा कशा प्रकारे सामना करतात ? रेस्टॉरंटमधल्या किती रेसिपीज् जमून येतात आणि किती बिघडतात ? हे बघणं मजेशीर ठरणार आहे.

१८ फेब्रुवारीला प्रसारित होणा-या पहिल्या भागात या सर्वांच्या लहानपणाची गोष्ट बघायला मिळणार आहे तर रविवार १९ तारखेला दुपारी १ आणि संध्याकाळी सहा वाजता एका तासाच्या विशेष भागामधून ही गोष्ट ख-या अर्थाने सुरु होणार आहे.

‘दिल दोस्ती दोबारा’ या नव्या को-या सिझनची निर्मिती संतोष कणेकर यांची अथर्व थिएटर्स अॅंड आर्ट ही निर्मितीसंस्था करणार आहे तर दिग्दर्शनाची धुरा अद्वैत दादरकर आणि स्वप्निल मुरकर सांभाळणार आहेत. कथा आणि संवाद सुदीप मोडक आणि अभिषेक खणकर यांचे असणार आहेत. समीर सप्तीसकरच्या संगीताने सजलेलं या नव्या मालिकेचं शीर्षकगीतही असंच फ्रेश असणार आहे. 

थोडक्यात पहिल्या सिझनमध्ये धम्माल उडवून देणारे मित्र म्हणजे अमेय वाघ, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, पुजा ठोंबरे, सखी गोखले आणि स्वानंदी टिकेकर हे कलाकार या नव्या सिझनमध्ये नव्या नावांसह प्रेक्षकांना बघायला मिळतीलच पण त्यासोबतच काही नवीन पात्रांचाही यात समावेश असणार आहे. पहिल्या सिझनमधला माजघरातल्या या मित्रांनी प्रेक्षकांना आपल्या मैत्रीच्या धाग्यात घट्ट बांधून ठेवलं होतं.. आता खयाली पुलावच्या माध्यमातून मैत्रीची कोणती नवी ‘डीश’ ते सादर करतील हे येत्या १८ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांना बघायला मिळेल फक्त झी मराठी आणि झी मराठी एचडीवर.