राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये संधीसाधू राजकारण!

राज्यात जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बहुसंख्य ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनं बाजी मारलीय. तर अनेक संधी साधू युती पहायला मिळाल्यात. मनसेनं ठाणे, औरंगाबादेत शिवसेना-भाजप युती धक्का दिलाय.

Updated: Mar 21, 2012, 09:05 PM IST

www.24taas.com, मुंबई

राज्यात जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बहुसंख्य ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनं बाजी मारलीय. तर अनेक संधी साधू युती पहायला मिळाल्यात. मनसेनं ठाणे, औरंगाबादेत शिवसेना-भाजप युती धक्का दिलाय. नाशिकमध्ये शिवसेनेनं घेतलेल्या आडमुठ्या भूमिकेला ठाणे मनपापाठोपाठ ठाणे जिल्हा परिषद आणि औरंगाबाद जिल्हा परिषदेत मनसेनं उत्तर दिलंय.

 

 

औरंगाबादमध्ये मनसेच्या दोन सदस्यांनी आघाडीला मतदान केल्यानं काँग्रेसच्या नईदाबानो फेरोज यांची अध्यक्षपदी निवड झालीय. तर गोपीनाथ मुंडे यांच्या बीडमध्ये राष्ट्रवादीचे सय्यद अब्दुल्ला यांची निवड झालीय. भाजपचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानं बीड जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेच्या मुंडेंच्या प्रयत्नांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुरुंग लावलाय.

 

 

घरकुल घोटाळ्यामुळे चर्चेत असलेल्या जळगाव जिल्ह्यात शिवसेना भाजपसोबत गेल्यानं भाजपचे दिलीप खोडपे अध्यक्षपदी निवडून आलेत. सुरेश जैन यांच्या अनुपस्थितीमुळे शिवसेना-भाजप एकत्र येऊ शकले अशी चर्चा आहे. तर नागपुरात शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आलेत. त्यामुळं नागपुरच्या संध्या गोतमारे अध्यक्ष झाल्या आहेत. तर यवतमाळ, गडचिरोलीतही राष्ट्रवादीनं काँग्रेसनं दे धक्का दिलाय. या दोन्ही ठिकाणी शिवसेना-भाजपला साथीला घेऊन राष्ट्रवादीनं सत्ता स्थापन केलीय.

 

 

राज्यात आज झालेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीत राष्ट्रवादी काँग्रेसनं सर्वाधिक 14 ठिकाणी बाजी मारलीय. तर काँग्रेसला सात ठिकाणी अध्यक्षपदं मिळवता आलीत. महायुतीनं सहा ठिकाणी अध्यक्षपदं जिंकलीत. मात्र अध्यक्षपदाच्या निवडीत अनेक ठिकाणी वेगळी समीकरणं पुढं आलीत. राष्ट्रवादीने काँग्रेसला बाजूला सारत युतीच्या मदतीनं अमरावती, यवतमाळ, गडचिरोली याठिकाणी युतीच्या मदतीनं राष्ट्रवादीने अध्यक्षपद पटकावलय. तर चंद्रपूर आणि नागपुरात भाजपनं राष्ट्रवादीची साथ घेत आपला अध्यक्ष बसवलाय. यवतमाळमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना राष्ट्रवादीने धोबीपछाड दिलीय. तर रायगडमध्ये रिपाइंचा अध्यक्ष झालाय. औरंगाबाद आणि ठाण्यात मनसेच्या मदतीनं काँग्रेस आघाडीचा झेंडा फडकलाय.

 

 

कोल्हापुरात काँग्रेसचा झेंडा

कोल्हापूर जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकलाय. काँग्रेसचे संजय मंडलिक यांची अध्यक्षपदावर निवड झालीय. तर उपाध्यक्षपद काँग्रेसच्याच हिंदूराव चौगुलेंना मिळालय. अध्यक्षपदासाठी काँग्रेसमधून अमोल महाडीक इच्छुक होते. मात्र त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळं त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादीच्या बळावर अध्यक्षपद मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं त्यांना मदत करायला नकार दिला. त्यामुळं त्यांना माघार घ्यावी लागली. पुढची सव्वा वर्ष अध्यक्षपद महाडिक यांना देण्याचं आश्वासन देण्यात आलय.

 

माणिकरावांना दणका

यवतमाळमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंना राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं दणका दिलाय. अमरावतीत राष्ट्रवादीने काँग्रेस विरोधात सर्वपक्षीय आघाडी उभारून दणका दिलाय. गडचिरोली आणि चंद्रपूरात राष्ट्रवादी आणि भाजपची युती झालीय. त्यामुळं तिथं काँग्रेसला अध्यक्षपदं मिळाली नाहीत. गडचिरोलीत राष्ट्रवादीचा तर चंद्रपुरात भाजपचा अध्यक्ष झालाय. औरंगाबाद आणि ठाण्यात मनसेनं आघाडीला साथ दिली.