राज… बिहारमध्ये येऊन दाखवा - अबू आझमी

शुक्रवारी राज ठाकरेंनी बिहारच्या मुख्य सचिवांना केलेल्या मज्जावानंतर पलटवार करण्याची संधी सोडतील ते अबू आझमी कसले...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 1, 2012, 06:32 PM IST

www.24taas.com, मुंबई
बिहारच्या मुख्य सचिवांच्या पत्रावर बसरलेल्या राज ठाकरेंच्या वक्तव्यावर आज दिवसभर तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. अबू आझमी आणि राज ठाकरे यांच्यातला प्रांतिय वाद आता नवा राहिलेला नाहीय. शुक्रवारी राज ठाकरेंनी बिहारच्या मुख्य सचिवांना केलेल्या मज्जावानंतर पलटवार करण्याची संधी सोडतील ते अबू आझमी कसले...
‘राज ठाकरे यांच्या पक्षाला म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नक्षलवादी, फुटीरतावादी म्हणून घोषित करावे. राज ठाकरे हे नक्षलवादाचे पुजारी आहेत. मुंबई पोलिसांना दुसर्या राज्यात जायचे असेल तर त्यांनी तसे तेथील सरकारला कळवावं. देश राज्यघटनेनुसार चालतो कोणाच्या गुंडागर्दीने चालत नाही. राज यांना परप्रांतीयांवर एवढाच आक्षेप असेल तर राजनं एकदा तरी बिहारमध्ये येऊन दाखवावं’ असं आव्हानच समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी राज ठाकरेंना दिलंय. तसंच बिहारच्या मुख्य सचिवांचं पत्र योग्यच आहे, असा अजब पवित्रा सपाचे आमदार अबू आझमी यांनी घेतलाय.
तर, ‘राज यांनी परप्रांतीयांना घुसखोर म्हणण्याची चूक करु नये, लोकांना देशात कुठेही जाण्याचा, राहण्याचा, काम करण्याचा अधिकार आहे. बिहारच्या मुख्य सचिवांनी पाठवलेल्या पत्रात राजनं ढवळाढवळ करु नये. त्यासाठी राज्य सरकार आहे’ असा टोला काँग्रेसचे खासदार संजय निरुपम यांनी राज ठाकरेंना लगावलाय. राष्ट्रीय जनता दलाचे नेते रामकृपाल यादव यांनी राज ठाकरेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय. तर ठाकरे कुटुंबीयच परप्रांतीय असल्याची खरमरीत टीका काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी केलीय. तर

महाराष्ट्राचे गृहमंत्री काय म्हणतात
दरम्यान, ज्या बिहारच्या मुख्य सचिवांच्या पत्रावरून वाद झालाय ते पत्र महाराष्ट्र सरकारला मिळाल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिलीय. महत्त्वाचं म्हणजे आरोपी पकडून देण्यात महाराष्ट्राला बिहार पोलिसांनी वेळोवेळी सहकार्य केल्याचंही गृहमंत्र्यांनी नमूद केलंय.

नेमकं काय म्हटलं होत राज ठाकरेंनी...
शुक्रवारी राज ठाकरे यांनी सीएसटी हिंसाचार प्रकरणी बिहारमध्ये दंगेखोरांना अटक करण्यासाठी मुंबई पोलीस गेले असता. बिहारच्या मुख्यसचिवांनी त्यांना मज्जाव केला होता. तसेच कारवाई करण्याचा इशारा दिला होता. बिहारमध्ये गुन्हेगारांना पकडण्यात गैर काय? असा सवाल करत, राज ठाकरेंनी ‘मुंबई पोलिसांवर कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास बिहारींना घुसखोर समजून हाकलून देऊ’ असा इशाराही बिहारच्या मुख्य सचिवांना दिला होता. आता नितिशकुमार गप्प का, असा सवालही यावेळी राज ठाकरेंनी विचारला होता.