'प्रश्न सोडवा अन्यथा 'ओएलएक्स पे बेच देंगे' प्रमाणे लोक सरकार बदलतील'

आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभर फिरतात. ते मेणाच्या पुतळ्यासोबत पोज देतात. मात्र, त्यांना दुष्काळग्रस्त मराठवाडा दिसत नाही, अशी बोचरी टीका जेएनयूचा अध्यक्ष कन्हैया कुमार यांने येथे केली.

Updated: Apr 23, 2016, 09:26 PM IST
'प्रश्न सोडवा अन्यथा 'ओएलएक्स पे बेच देंगे' प्रमाणे लोक सरकार बदलतील'  title=

मुंबई : आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभर फिरतात. ते मेणाच्या पुतळ्यासोबत पोज देतात. मात्र, त्यांना दुष्काळग्रस्त मराठवाडा दिसत नाही, अशी बोचरी टीका जेएनयूचा अध्यक्ष कन्हैया कुमार यांने येथे केली.

चेंबूर-टिळकनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या भेदभावविरोधातील विद्यार्थी-युवक मेळाव्यात प्रमुख वक्ता म्हणून कन्हैया बोलत होता. आधी वरळी येथे हा कार्यक्रम होणार होता. परंतु पोलिसांनी तिथे परवानगी नाकारली. त्यामुळे हा कार्यक्रम टिळकनगरमध्ये घेण्यात आला. येथील कार्यक्रमस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भाषण ऐकण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. 

आम्ही हे आंदोलन सुरू केलेय कारण, देशातील ब्राह्मणवाद आणि संघवाद नष्ट करायचाय. जुमलेबाज विरुद्ध जांबाज, अशी ही लढाई आहे. ती लढाई आम्हीच जिंकणार, असा एल्गार कन्हैया कुमार याने पुकारला. 

कन्हैयाने आपल्या भाषणात मोदी सरकारवर हल्लाबोल केला. जेएनयू वाद, नागपूरमधील कार्यक्रमावर झालेला हल्ला, रोहित वेमुला आत्महत्या, महाराष्ट्रातील दुष्काळ आदी मुद्द्यांवर चौफेर सरकारविरोधात टीका केली. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर आसून ओढलेत. 

भाषणातील ठळक बाबी

- मोदी जगभर फिरतात, स्वत:च्या मेणाच्या पुतळ्याशेजारी फोटोसाठी पोज देतात. दुष्काळग्रस्त मराठवाड्यात यायला वेळ नाही.
- 'मेक इन इंडिया नाही' हे खरं तर 'फेक इन इंडिया' आहे. 
- शेती, उद्योग, शिक्षण आणि पायाभूत सुविधांवर पैसा खर्च करणार नसेल तर रोजगार कुठून निर्माण करणार.
- सरकार शिक्षणासाठी अर्थसंकल्पातील केवळ १ टक्के पैसा खर्च करत आहे. 
- ट्विटवर ट्विटिव करणं बंद करा आणि तळागाळातील लोकांसाठी काम करा. अन्यथा 'ओएलएक्स पे बेच देंगे' प्रमाणे लोक सरकार बदलतील, अशा इशारा दिला 
- बुलेट ट्रेन हवीच आहे. ती जरूर चालवा पण थोडं सामन्य ट्रेनच्या जनरल बोगीकडे आधी लक्ष द्या. 
- जातीव्यवस्थेचा बळी ठरलेल्या रोहित वेमुलाला आम्हाला न्याय मिळवून द्यायचा आहे.